गुढीपाडव्यावर पावसाचे सावट
विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : होळीच्या सणानंतर उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच मुंबईसह कोकण किनारपट्टी परिसरात गुढीपाडव्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज दुपारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उद्या (ता. १९) मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना सध्या तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवेत काहीसा आर्द्रतायुक्त गारवा जाणवू शकतो. शेजारील ठाणे जिल्ह्यात उद्या पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता असून, तिथे ‘हलका ते मध्यम’ पाऊस पडू शकतो. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असून, येथे विजांच्या कडकडाटासह ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
...
आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ
कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील तापमानाचा पारा चढलेलाच आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ७२ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने मुंबईकरांना प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवत आहे. येत्या २४ ते ४८ तासांत होणाऱ्या हलक्या पावसामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अचानक बदलणारे हवामान आणि वाढता उकाडा यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.