वैद्यक परिषद निवडणुकीतही राजकीय हस्तक्षेप
माजी अध्यक्षांचा आरोप; दबावाला बळी न पडण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : स्वयंसेवी संस्था, साहित्य संस्था असो किंवा एशियाटिक सोसायटीतील सरकारी हस्तक्षेपाचे लोण आता वैद्यक परिषदेच्या निवडणुकीपर्यंतही पोहोचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यक परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष व सभासदांच्या पॅनेलमधील उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी केला आहे. या दडपशाहीला मतदानाच्या रूपात उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सदस्य परिषदेचे माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनेलमधील उमेदवारांना ‘माघार घ्या, आमच्याकडे या अन्यथा सरकारी रोष ओढवून घ्याल,’ असे सांगणारे दूरध्वनी येत असल्याचा आरोप सुहास पिंगळे यांनी केला आहे. तसेच माघार न घेतल्यास परिणामांना तयार राहा, अशी भाषा वापरली जात आहे. हे सरळ सरळ दबाव, दडपशाही आणि भीतीचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दबावाला बळी पडून एका उमेदवाराने माघार घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वरिष्ठ नेते, माजी अध्यक्ष यांनी तयार केलेल्या पॅनेलमधील अनेक उमेदवारांना असे फोन आल्याचा दावाही पिंगळे यांनी केला. त्यामुळे वैद्यकीय स्वायत्तता जपण्यासाठी तसेच ही संस्था कोणाच्याही दावणीला बांधली जाणार नाही, हे निश्चित करण्यासाठी सर्वांनी मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ही अत्यंत गंभीर बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र वैद्यक परिषदेची स्वायत्तता कायम राहिली पाहिजे. निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होणे अत्यंत निषेधार्थ आहे.
- डॉ. हेमंत वाघ, उमेदवार
-------------
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकांमध्येही राजकीय हस्तक्षेप होणे, हे परिषदेच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे.
- डॉ. सुहास पिंगळे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद