अंधेरी आरटीओ कार्यालयावर
आज रिक्षाचालकांचा मोर्चा
मुंबई, ता. ७ : ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळा’च्या नोंदणीसाठी केली जाणारी शुल्क सक्ती आणि आरटीओ प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागण्यांसाठी बुधवारी (ता. ८) अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) रिक्षाचालक मोर्चा आणि निदर्शने करणार आहेत.
गेल्या २० वर्षांपासून रिक्षाचालक स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी करत होते; मात्र शासनाने कोणत्याही संघटनांशी चर्चा न करता एकतर्फी मंडळ स्थापन करून त्यात ५०० रुपये प्रवेश फी आणि ३०० रुपये वार्षिक फी सक्तीची केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ही फी रिक्षाचालकांना न परवडणारी असल्याचे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या चालकांनी या मंडळात नोंदणी केली नाही, त्यांची आरटीओमधील परमिट नूतनीकरण आणि पासिंगची कामे अडवली जात आहेत. हा प्रकार बेकायदा असून तातडीने थांबवावा, अशी मागणी युनियनने केली आहे. उद्याच्या निदर्शनानंतर यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन दिले जाणार आहे.