कृत्रिम दागिन्यांच्या कारखान्यांमुळे आरोग्याला धोका
मुंबई, ता. ७ : मुंबईतील दाटीवाटीच्या निवासी क्षेत्रांमध्ये आणि झोपडपट्टी भागांत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत कृत्रिम दागिन्यांच्या कारखान्यांमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणत्याही परवानग्या न घेता, केवळ काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे जीवघेणे उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगरसेवक अजित रावराणे यांनी केला आहे.
कृत्रिम दागिने बनवण्याच्या प्रक्रियेत अॅसिड आणि मानवी शरीराला घातक असलेल्या विविध रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नियमांची पायमल्ली करत हे कारखाने प्रदूषित पाणी थेट उघड्या गटारांमध्ये सोडत आहेत. त्यामुळे परिसरात वायू आणि जलप्रदूषणाची पातळी भयानक वाढली आहे. या विषयावर आगामी जून महिन्याच्या महासभेत प्रशासनाकडून सविस्तर उत्तर मागविण्यात येणार आहे, अशी माहिती अजित रावराणे यांनी दिली.