गेटवे-मांडवा फेरीबोट सुरक्षा तपासण्याची मागणी
जुन्या लाँचमुळे सुरक्षेचा प्रश्न
मुंबई, ता. १ : पावसाळी विश्रांतीनंतर गेटवे ऑफ इंडिया-मांडवा जलमार्गावरील फेरीबोट सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर दरवर्षी सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी ये-जा करतात; मात्र या मार्गावर ४० ते ५० वर्षे जुन्या लाँच आणि फेरीबोटी कार्यरत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.
गेटवे-मांडवा जलमार्गावर गेटवे जलवाहतूक सहकारी संस्थेमार्फत जुन्या लाँच आणि फेरीबोटी चालविल्या जातात. या बोटी समुद्रात भरकटणे, तांत्रिक बिघाडामुळे बंद पडणे किंवा अन्य कारणांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. शिष्टमंडळाने मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुथु यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्यांबाबत निवेदन दिले. भाऊचा धक्का येथे प्रवाशांसाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने बसविलेले पिण्याच्या थंड पाण्याचे कुलर पुन्हा सुरू करावेत, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
सुट्टीच्या दिवशी भाडेवाढ नको!
अलिबाग-मुंबई जलवाहतुकीमुळे पर्यटकांसाठी गेटवे-मांडवा मार्गाला मोठी पसंती मिळते; मात्र शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या सेवांचे भाडे वाढविले जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.