संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीचे संरक्षण करा!
अन्यथा आंदोलन; मंत्र्यांसोबत बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : संत तुकाराम महाराजांच्या ध्यान-साधनेने पावन झालेल्या देहू परिसरातील भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर डोंगरांचे तातडीने संरक्षण करावे, अशी मागणी ‘संतभूमी संरक्षक संघर्ष समिती’ आणि ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’ने केली आहे. या परिसरातील कथित अवैध उत्खनन, सपाटीकरण, बांधकामे आणि अतिक्रमणे थांबविली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीचे मधुसूदन पाटील महाराज यांनी दिला.
या प्रश्नावर येत्या ४ सप्टेंबरला सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्यासोबत बैठक होणार आहे. बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास वारकरी आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असे समितीने स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात आली. भामचंद्र आणि भंडारा डोंगरांना २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही परिसरात उत्खनन, सपाटीकरण, बांधकामे आणि अतिक्रमणे सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे. भामचंद्र डोंगर परिसरात २००७ पासून अवैध खाणकाम सुरू असल्याचा समितीचा दावा आहे. कारवाईनंतरही उत्खनन पूर्णपणे थांबले नसल्याचे समितीने म्हटले आहे. या उत्खननामुळे भामचंद्र डोंगराचा पूर्वेकडील कडा ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
...
२०१६चा अहवाल प्रलंबित
भंडारा डोंगराचा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असल्याने तो सरकारजमा करण्याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी २०१६मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता; मात्र १० वर्षांनंतरही त्यावर निर्णय झालेला नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. या अहवालावर तातडीने निर्णय घेऊन तपोभूमीचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
--------------------
तपोभूमीचे संरक्षण करा अन्यथा आंदोलन
संत तुकारामांच्या साधनेने पावन परिसर; मंत्र्यांसोबत बैठक