वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या
अधिकाऱ्यांची चौकशी करा
‘स्थायी’च्या अध्यक्षांचे पालिका प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेच्या विविध विभागांत १० ते २० वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्या तातडीने बदल्या करा, असे स्पष्ट निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. काँग्रेस नगरसेवक अशरफ आझमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून ‘हे अधिकारी नेमके सत्ताधाऱ्यांचे कोण लागतात,’ असा थेट सवाल विचारल्यानंतर स्थायी समितीत यावरून जोरदार गदारोळ झाला.
गारगाई नदीवरील प्रस्तावित प्रकल्पासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट’ नियुक्तीच्या प्रस्तावावर चर्चेदरम्यान अशरफ आझमी यांनी जल विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. जल विभागातील अनेक अभियंते आणि अधिकारी तब्बल १० ते २० वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहेत. डीपीआर आणि सल्लागार नियुक्तीत मोकळी स्पर्धा न होता ठरावीक कंपन्यांशी ‘सेटिंग’ करून कामे दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मोठ्या प्रकल्पांच्या खर्चाचे आणि कारभाराचे स्वतंत्र ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक आझमी यांच्या या आरोपांची गंभीर दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. एकाच विभागात १० ते १२ वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात आणि ते आजवर एकाच ठिकाणी का टिकून राहिले, याची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.