भाजप सरकारच्या काळात दलितांवर अन्याय
काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांचा आरोप
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार)ः नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दलित व मुस्लिम समाजाच्या दोन मुलांना केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला चिंता करायला लावणारी आहे. रामटेक घटनेत पोलिसांनी काही जणांना अटक केली असली, तरी मंदिर प्रवेशावरून मरेपर्यंत मारहाण करण्याची मानसिकता महाराष्ट्रात निर्माण होणे हेच अत्यंत गंभीर आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून दलित, मागास व अल्पसंख्यक समाजावरील अत्याचार वाढले आहेत, असा आरोप मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
मागील दीड वर्षात अल्पसंख्याक व दलित समाजावरील हल्ले वाढले आहेत. नाशिकमध्ये मुंबईतील कुर्ल्यातील मुस्लिम तरुणाचा झुंडशाहीने बळी घेतला, नांदेड जिल्ह्यात लग्नाच्या वरातीत आला म्हणून अक्षय भालेराव या दलित तरुणाची हत्या करण्यात आली. लातूरमध्ये किरकोळ कारणावरून दलित तरुणाची हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून हत्या करण्यात आली. नवी मुंबईत आंतरजातीय विवाहावरून दलित तरुणाची हत्या करण्यात आली. या घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. भाजप सरकारच्या काळातच या समाज घटकांवर हल्ले होत असताना सरकारकडून कठोर पावले उचलली जात नाहीत. मागासवर्गिय, दलित, अल्पसंख्याक समाज भीतीच्या सावटाखाली जगत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या समाजघटकाला आश्वस्त करण्याची गरज आहे. राज्य सरकारने कडक कारवाई करून सामाजिक एकोपा राखला जाईल यासाठी काम करण्याची नितांत गरज असल्याचे राजहंस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.