मानसिक रुग्णांची सुरक्षा रामभरोसे
पुणे आणि ठाण्यातील मानसिक रुग्णालयांमध्ये हाणामारीचे प्रकार; रुग्णांचा एकमेकांवर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ठाणे आणि पुण्याच्या प्रादेशिक मानसिक रुग्णालयांत गेल्या साडेतीन वर्षात २६२ हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रुग्ण एकमेकांवर हल्ला करत असल्याचे आढळले आहे; तर काही घटनांमध्ये रुग्ण कर्मचाऱ्यांवरही हल्ला करत आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ही प्रकरणे पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी असून उत्तम औषधे आणि अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे कोणतीही मोठी घटना घडली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर रुग्णांची चिडचिड होते आणि हिंसक वृत्ती बनते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. पुण्याच्या मनोरुग्णालयात अशा घटना अधिक घडल्या आहेत. नागपूर दुसऱ्या क्रमांकावर; तर ठाण्याचे मनोरुग्णालय तिसऱ्या क्रमांकावर आहे. रत्नागिरीच्या मनोरुग्णालयाचा चौथा क्रमांक आहे.
मानसिक रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण, स्क्रिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, अधूनमधून स्फोटक विकार आणि इतर मानसिक आजारांनी ग्रस्त असून कधीकधी ते इतके आक्रमक होतात की, ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी भांडतात. मानसिक रुग्णालयात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मानसिक रुग्णालयातील हिंसाचाराची माहिती मागवली होती.
यासंदर्भात राज्याच्या मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की,
असे रुग्ण चिडून भांडायला लागतात. त्यांना अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात. अशा केसेस पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहेत. उत्तम औषधे आणि अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. याशिवाय कोणत्याही रुग्णाने गळफास लावू नये, यासाठी आम्ही रुग्णालयातील सिलिंग फॅन काढून टाकले आहेत. रुग्णाने हल्ला केल्यास जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे रुग्णालयात कोणतीही काचेची वस्तू असू नये, याकडे लक्ष दिले जाते. एवढेच नाही, तर नर्स स्वत: रुग्णाला औषध देते.
पुण्यात १६६ हिंसाचाराच्या घटना
पुण्यातील मानसिक रुग्णालयात १६६ हिंसक घटना घडल्या असून, त्यात १६६ रुग्ण जखमी झाले आहेत. ठाण्यातील मनोरुग्णालयात रुग्णांमध्ये मारामारीच्या १०३ घटना घडल्या आहेत; तर १० कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या मनोरुग्णालयात १२६ हिंसक घटना घडल्या; तर रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात एकही हाणामारीची घटना घडली नाही.
डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण
ठाणे रुग्णालय प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्ण हिंसक होण्यामागे अनेक कारणे आहेत. एक तर त्याची मानसिक स्थिती ठीक नसते. कुटुंबाने सोडून दिल्याने अनेक रुग्ण नैराश्यग्रस्त होतात. अशा रुग्णांची औषधे बदलत असतात. काही रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. मनोरुग्णांवर चांगले उपचार केले पाहिजेत, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनस्थिती चांगली नसली, तरी संयम बाळगावा लागतो. जर ते हिंसक वर्तन करत असतील, तर त्यांना योग्यरीत्या नियंत्रित केले पाहिजे. यासाठी विशेष रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाते.
कोविडमुळे २१ रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू
आरटीआयच्या माहितीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत एकूण ९२४ रुग्ण आणि मानसिक रुग्णालयातील कर्मचारी कोरोना महामारीचे बळी ठरले आहेत. त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, नागपूरच्या मनोरुग्णालयात सर्वाधिक ३७७ बाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबतच येथे ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे २७ कर्मचाऱ्यांनाही लागण झाली. तसेच, ठाणे मानसिक रुग्णालयात ३०७ रुग्ण आणि १०५ कर्मचारी संसर्गाचे बळी ठरले आहेत. त्यापैकी १० रुग्ण आणि दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरीच्या रुग्णालयात ९७ रुग्ण आणि ११ कर्मचाऱ्यांना लागण झाली. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.