मुंबई, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक झाल्याने कोणत्या मतदारसंघात, पक्षाला कुठे आघाडी मिळाली आणि कुठे मते कमी मिळाली, याचा अंदाज असल्यामुळे खासदारांनी व्होट बॅंक बांधण्याची जबाबदारी घेत विधानसभा निवडणुकीचे प्रत्येक मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग सुरू केले आहे.
मुंबईतील खासदारांवर आपापल्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खासदारांना गेल्या निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणकोणत्या विभागात, कोणत्या केंद्रात मते कमी मिळाली. त्याचा आढावा घेतला जात आहे. अशा मतदान केंद्रांवर कशा पद्धतीने मतांची टक्केवारी वाढवता येईल, याचा आढावा विभागवार बैठका घेऊन खासदार घेत आहेत.
भरघोस मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे तिथेही प्रचारात भर देण्यात येत आहे. अशा प्रकारे मुंबईत नियोजन करण्यात येत आहे.
ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई आणि दक्षिण मुंबईत अरविंद सावंत हे तीन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत. वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या खासदार आहेत. पियूष गोयल हे भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. या खासदारांवर निवडणुकीच्या नियाेजनाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या-त्या विभागातील शिवसेना उपनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विधासभेचा आढावा घेत असून पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जात आहे.
इच्छुक उमेदवारांच्या कामाची चाचपणीही केली जात असल्याचे समजते. भाजपने आधीच तयारी केली असून शिंदे गट आणि काँग्रेसनेही बैठकांचा धडाका लावला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहूजन पक्ष, समाजवादी पक्ष आदी महायुती आणि आघाडीतील घटक पक्षही जोरदार तयारी करीत आहेत.
आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच पक्षात आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षीय कार्यालये आणि राजकीय नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात या वेळी जोरदार लढत होणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.
इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा असल्याने सर्वानुमते उमदेवार देण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.