मेट्रो कारशेड उभारणीला ब्रेक
स्थानिक आंदोलनाच्या तयारीत; डोंगरी गावातही विरोध
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : भाईंदरजवळील डोंगरी गावात सरकारी जागेवर होत असलेल्या मेट्रो कारशेडला तीव्र विरोध होऊ लागला आहे. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने स्थानिकांनी कारशेड होऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिकांच्या या विरोधामुळे कारशेड विरोधातील हे दुसरे आंदोलन उभे राहत आहे. याआधी ही कारशेड मोर्वा गावामागे होणार होती; मात्र शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे कारशेडची जागा बदलावी लागली. आता डोंगरी गावातही कारशेडला विरोध होत आहे. त्यामुळे कारशेडच्या उभारणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिरा-भाईंदरला येत असलेली मेट्रो सुरुवातीच्या नियोजनानुसार भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतच धावणार होती. त्या वेळी त्याच परिसरात कारशेडसाठी जागेचा शोध सुरू होता; मात्र एकाही जागेवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. त्यानंतर मेट्रो मार्ग मोर्वा गावापर्यंत विस्तारण्याचा व मोर्वा गावाच्या मागे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असल्याने स्थानिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्याला स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.
कारशेड ज्या जागेवर उभारली जाणार आहे, ती शेतजमीन असून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या जागा कारशेडसाठी देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतल्या. या भूमिकेला आंदोलनाचे स्वरूप आले. स्थानिकांनी वेळोवेळी जाहीर सभा घेतल्या. निवेदने दिली. मुख्यमंत्र्यांपर्यंतही बाब पोहोचली. अखेर त्या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेत स्थानिकांची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. त्यानंतर कारशेडची जागा बदलली. लगतच्या डोंगरी गावात असलेल्या सरकारी जागेवर ती बांधण्याचे निश्चित झाले. कारशेड उभारणीच्या पार्श्वभूमीवर सरकारी जागेचे सर्वेक्षण पार पडले तसेच कारशेड बांधणीची निविदा प्रक्रियादेखील पार पडली; मात्र आता कारशेडमुळे बाधित होत असलेल्या झाडांचा प्रश्न आल्यानंतर विरोधाची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.
सुरुवातीला एमएमआरडीएने सुमारे १,४०० झाडे काढण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली, त्यानंतर आता सुमारे ९,९०० झाडे काढण्याची परवानगी मागितली आहे; मात्र यातील निम्म्याहून अधिक झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. उर्वरित झाडांच्या बदल्यात त्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार असल्याचा खुलासा एमएमआरडीएने केला आहे; मात्र हा मुद्दा पर्यावरणप्रेमी व स्थानिकांना मान्य नाही. मुळात एकदा काढलेल्या झाडांचे पुनर्रोपण यशस्वी होत नाही. पुनर्रोपणात जगलेल्या झाडांचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय, या जागेवर होत असलेली भाजीपाल्याची शेतीही नष्ट होईल, असे मुद्दे घेत स्थानिकांनी कारशेडला तीव्र विरोध केला आहे.
वर्षभराचा विलंब
आधीच मिरा-भाईंदरला येत असलेल्या मेट्रोला बराच उशीर झाला आहे. मेट्रोचा काशी मिरापर्यंतचा पहिला टप्पा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होणे अपेक्षित होते, तो आता यावर्षी डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो भाईंदरपर्यंत येण्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.
मेट्रोसाठी कारशेड होणे आवश्यक आहे; मात्र त्याचसोबत स्थानिकांचे नुकसान होणार नाही, तसेच कारशेड उभारताना झाडांचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने जागेची निवड करण्यासंबंधीच्या सूचना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.