विरार, ता. ६ (बातमीदार) : अन्न व औषध प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात वसई-विरार शहरातील १८३ आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांतून १५४ वेगवेगळे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यापैकी १४ अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल अप्रमाणित घोषित झाल्यामुळे त्या दुकानांवर एकूण १४ केस दाखल करण्यात आल्याची माहिती या विभागाचे सहाय्यक आयुक्त प. रा. सिंगरवाड यांनी दिली.
मागील काही वर्षांत वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. यासोबतच शहरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व फेरीवाले आणि मेडिकल स्टोअर्सची संख्याही प्रचंड वाढलेली आहे. या व्यावसायिकांच्या माध्यमातून अनेक खाद्यपदार्थ, पेये आणि औषधांची विक्री करण्यात येते; परंतु नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची काळजी व्यावसायिकांकडून घेण्यात येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि औषध विक्री दुकानांतून भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अनेक हॉटेल्सच्या किचन रूममध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आलेला आहे. त्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाने सांगितल्या.
खाद्यपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी वसई-विरार शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि स्टॉल्सची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ग्राहक संरक्षण कक्षाने केली होती. या मागणीच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक किशोर पाटील यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन विभागाने हा खुलासा केला आहे. तपासणीच्या अनुषंगाने एकूण १२४ अन्न आस्थापनांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी सात केस दाखल करण्यात आल्या आहेत. पाच प्रकरणांत २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पाच आस्थापनांचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती सिंगरवाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.