कामण-चिंचोटी-भिवंडी महामार्गाची दुरवस्था
पालघरसह ठाण्यातील वाहनचालकांची गैरसोय; काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा
वसई, ता. २० (बातमीदार) ः एकीकडे कोट्यवधींचे विकास प्रकल्प जिल्ह्यातून जात असताना वाहतूक यंत्रणेत सुधारणा होताना दिसून येत नाही. जिल्ह्यातील महामार्गाला कोंडी आणि दुर्घटनेचा विळखा पडत चालला आहे. वसई येथील कामण, चिंचोटी व भिवंडी हा मार्ग पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे; मात्र तो अडचणींचा ठरत आहे. गेली १० वर्षे येथील वाट प्रवाशांना बिकट ठरत असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात, मुंबई व ठाणे जिल्ह्यातून ये-जा करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर केला जातो, मात्र पावसाळ्यात महामार्गावर जलमयस्थिती होत असल्याने रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहेत. त्याचे अवघे काही काम शिल्लक आहे, ते लवकरच पूर्ण होईल, असे महाराष्ट्र प्राधिकरण विभागाने स्पष्ट केले आहे, परंतु याच मार्गावरून भिवंडी, ठाणे जिल्ह्यात व पालघरमध्ये ये-जा करणाऱ्या कामण-चिंचोटी व भिवंडी महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. हा महामार्गदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. शिवाय छोटी-मोठी वाहतूकदेखील चोवीस तास सुरू असते, मात्र महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. एकीकडे रस्ते सुधारणा, नवे पर्यायी मार्ग निर्माण करणे तसेच वाहतूक व्यवस्थेला बळ देणे हाती घेतले असले तरी वसईतील कामण-चिंचोटी व ठाण्यातील भिवंडी असा जोडला गेलेला महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. वाहतूक कोंडी व दुर्घटनेला आमंत्रित करत आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आर्थिकदृट्या फायदेशीर आहे, व्यवसायाच्या दृष्टीनेदेखील त्याकडे पाहिले जाते, परंतु महामार्गाची दुरवस्था झाली असल्याने दळणवळणाची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग सुखकर प्रवासासाठी कधी वरदान ठरणार याची प्रतीक्षा वाहनचालक करत आहेत.
-----------
वसईतील कामण, चिंचोटी-भिवंडी या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, परंतु अद्यापही या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात अशा घटना वारंवार घडत आहेत. हा मार्ग प्रवाशांना सुकर असावा म्हणून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली. जर याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन छेडले जाणार आहे.
-समीर सुभाष वर्तक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष
-----------
शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट
दोन जिल्ह्यांना जोडला गेलेला महामार्ग अद्यापही नादुरुस्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांच्यासोबत व्यापारी विभागाचे प्रदेश सरचिटणीस के. अश्रफ, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल, सेवादलचे प्रदेश सरचिटणीस परवेझ खान, पर्यावरण विभागाचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष नौशाद अन्सारी व वसई- विरार शहर जिल्हा कमिटीचे डेरीक फुर्टाडो, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संकेत वसईकर आणि संदेश भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. तसेच २६ मे रोजी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.