मुंबईत दररोज सरासरी २७ जणांना कोरोना
खबरदारी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत दरराेज सरासरी २७ कोरोना रुग्ण आढळत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. इतर आजारांनी त्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
पावसाळी आजारांसोबतच यंदा मुंबईकरांना कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आहे. जूनमध्ये आतापर्यंत दररोज सरासरी मुंबईतील २७ जणांना कोविडची लागण झाली आहे. तर, मे महिन्यात दररोज सरासरी १४ जणांना संसर्ग झाला होता. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १५) मुंबईत २२ नवीन कोरोना रुग्ण आढळले. यावर्षी मे महिन्यातच कोविड संसर्गाने वेग घेतला.
नेवारीमध्ये कोरोनाचा फक्त एक, फेब्रुवारीमध्ये एक, मार्चमध्ये शून्य आणि एप्रिलमध्ये चार रुग्ण आढळले; परंतु मे महिन्यात ४३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. जूनच्या पहिल्या १५ दिवसांत ४१० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच या वर्षी जानेवारीपासून एकूण ८५१ जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
वाढत्या प्रकरणांमध्ये, आरोग्य विभागाने सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचे एक्सएफजी, एलएफ ७ आणि एनबी १.८.१ उपप्रकारदेखील आढळले आहेत. आतापर्यंत मुंबईत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्या सर्वांना इतर काही गंभीर आजार होते.
केईएम रुग्णालयाच्या एंडोक्रायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर म्हणाले, की मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत असते. अशा परिस्थितीत त्यांना काेरोना किंवा कोणताही विषाणू संसर्ग झाल्यास गुंतागुंत होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे वार्षिक लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. संसर्ग रोखता येत नाही; परंतु त्याची तीव्रता निश्चितच कमी होते.
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, कर्करोग, मधुमेह, किडनी डायलिसिस आदी आजारांनी ग्रस्त असल्यास स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरील अन्न, कोल्ड्रिंक्स टाळावेत. एखाद्याला सर्दी, खोकला आणि फ्ल्यूचा त्रास होत असेल तर मास्क घाला आणि गर्दीत जाऊ नका. जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही इतरांना संसर्ग करू शकता. डॉक्टरांशी संपर्क साधा आणि बरे होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही
बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी म्हणाले, की कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे; पण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरज पडत नाही. ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह येत आहे.
राज्यात संक्रमितांची संख्या २,०००च्या पार
रविवारी (ता. १५) महाराष्ट्रात ४० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यासह, यावर्षी राज्यात २१,४५६ लोकांची चाचणी केल्यानंतर २,००७ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे एकूण संक्रमितांपैकी १,४३९ लोक बरे झाले आहेत. सध्या राज्यात ५४० सक्रिय रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.