गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय
आयुक्त अभिनव गोयल यांचे शिक्षकांना मार्गदर्शन
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही शिक्षण परिषद कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात पार पडली. या शिक्षण परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निपुण भारत कार्यक्रम राबवला जात आहे. ज्यामध्ये महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत बौद्धिक स्तर वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विनोबा भावे ॲपच्या माध्यमातून मराठी-इंग्रजी आणि गणित विषयाची चाचणी घेण्यात आली आहे. त्याद्वारे महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत ते निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करून अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रारंभिक चाचणीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तर शिक्षकांना माहिती करून देणे, आवश्यक ते नियोजन करणे आणि तीन महिन्यांत महापालिका शाळांतील हे सर्व विद्यार्थी अंतिम टप्प्यापर्यंत कसे पोहोचतील, याबाबत मार्गदर्शनासाठी ही पहिली शिक्षण परिषद आयोजित केल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. ज्यामध्ये महापालिका शाळांचे सर्व शिक्षक, सनियंत्रण अधिकारी, मार्गदर्शन करण्यासाठी काही शिक्षण अभ्यासकही सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या सर्व उपक्रमांमागील अंतिम ध्येय असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद म्हटले. तसेच ही काही अवघड गोष्ट नाही. आपल्या महापालिका शाळांमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात, असा विश्वासही आयुक्तांनी या वेळी व्यक्त केला. या शिक्षण परिषदेला महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, तसेच विनोबा भावे ॲपचे भैरव गायकवाड उपस्थित होते.
...तर शिक्षकांवर कारवाई
महापालिकेकडून आता विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि महापालिका शिक्षकांची शिक्षण परिषद ही दर महिना घेण्यात येणार आहे. जेणेकरून शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासह त्याची परिणामकारकताही समोर येईल, महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थी हे पायाभूत चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतील. याची दखल न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.