ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी कासारवडवली येथे बांधण्यात आलेला उड्डाणपूल लवकर सुरू होऊ नये, असे काहिसे दिसून येत आहे. हा पूल आठवड्याभरापूर्वीच तयार झाला असतानाही तो वाहतुकीला खुला केला नाही. यासाठी त्रस्त झालेले नागरिक रविवारी (ता. ६) एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार होते. मात्र, पोलिसांनी या नागरिकांना तसे करू नका, असा दम भरला आहे.
घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथील चौक प्रचंड वर्दळीचा असल्याने येथील कोंडी दूर व्हावी, यासाठी ठाणे घोडबंदर मार्गावर एक उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. आठवड्याभरपूर्वीच त्याचे काम पूर्ण झाल्याने तो वाहतुकीसाठी सरकारला सोपवला आहे. परंतु, तो खुला करण्यात येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्ते रविवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता खुला करण्याचे ठरवले होते. तत्पूर्वीच स्थानिक पोलिसांनी या नागरिकांना शनिवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता पोलिस ठाण्यात बोलावून पूल खुला करू नका. तसे केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा दम दिल्याचे एका नागरिकाने सांगितले. परंतु, पूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने कासारवडवलीपासून थेट माजिवडा नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. दरम्यान, उद्घाटन झाल्याशिवाय पूल खुला होऊ देऊ नका. एका मंत्र्याचा असा फोन आल्याने पोलिसांनी नागरिकांना उड्डाणपूल खुला करण्यापासून रोखले, असे सूत्राकडून समजते.
वाहतूक कर्मचाऱ्यांचा २० तास खडा पहारा
ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी थेट कापूरबावडी, माजिवडा नाक्यापर्यंत पोहचत आहे. शुक्रवारी (ता. ५) ही कोंडी माजिवडा उपवाहतूक विभाग कार्यालयापर्यंत पोहचली होती. रात्री दोनच्या सुमारास ती कमी झाली. शनिवारीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना १८-२० तास रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.
रस्ता ओलांडण्यास ३० मिनिटे
विजय गार्डन, टायटन रुग्णालय, सेवा रस्ता, आनंदनगर, वडवली गाव, होरायझन शाळा असा सर्व परिसर त्रस्त झाला आहे. शालेय मुलांना रस्ता ओलांडायला २०-३० मिनिटे ताटकळत उभे राहावे लागते. रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही.
या तारखांना होणार होते उद्घाटन
पुलाचे उद्घाटन १५ एप्रिल, ३१ मे आणि ५ जून या तारखांना होणार होते; परंतु आता ते आणखीन आठवडाभर पुढे गेल्याचे समजते.
पुलाच्या उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्याचे काम बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही रस्त्याच्या मध्ये गटार बनवले जाणार आहे. त्यामुळे या कठड्याची उंची कमी ठेवल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. परंतु, पोलिसांच्या अशा म्हणण्याचे आश्चर्य वाटत आहे.
- गिरीश पाटील, जस्टीस फॉर घोडबंदर ग्रुप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.