‘अभंग रिपोस्ट’च्या भक्तिरसात रसिक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’च्या ‘अभंगवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. ६ : आषाढी एकादशीनिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात ‘सकाळ’तर्फे रविवारी (ता. ६) आयोजित ‘अभंगवारी’ला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘अभंग रिपोस्ट’ बँडच्या वैविध्यपूर्ण असलेल्या संगीताने भक्तिमय वातावरणात रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘अभंग रिपोस्ट’कडून सादर करण्यात आलेल्या प्रत्येक अभंग आणि भारुडावर उपस्थितांनी टाळ्यांसह ठेका धराला. या वेळी नामदेव-तुकाराम, निवृत्तीनाथ-सोपान-मुक्ताबाई यांच्यासह पांडुरंगाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. उपस्थितांना वारीचा आध्यात्मिक अनुभव या अभंगवारीतून घेता आला.
गिरगाव येथील ‘अभंग रिपोस्ट’ बँडच्या कलावंतांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांच्या अमृतमय अभंगांनी रॉक, रेगे, पॉप आणि लोकसंगीताच्या तालात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक टिप टॉप प्लाझा, प्रायोजक एलआयसी आणि सहप्रायोजक महाराष्ट्र बाजारपेठ होती. अभंगवारीच्या सुरुवातीला टिप टॉप प्लाझाचे प्रमुख जयदीप शहा आणि महाराष्ट्र बाजारपेठचे डॉ. कौतिकराव दांडगे यांचे ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी स्वागत केले. अभंगवारीची सुरुवात ‘चल गं सखे पंढरीला...’ या गाण्यापासून तर समारोप संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाला. पहिले गाणे सुरू होताच उपस्थितांनी ठेका धरीत उत्साही प्रतिसाद दिला. पुंडलिक हरी वरदे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, तुकारामांच्या जयघोषणाने रवींद्र नाट्यगृह निनादले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव’, संत तुकाराम याचे ‘पापाची वासना नको दावू डोळा’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा अभंगांच्या अनोख्या सादरीकरणाने उपस्थितही जयघोष आणि टाळ्यांच्या गजर करीत तल्लीन झाल्याचे दिसून आले.
भारुडाने उपस्थित मंत्रमुग्ध
संत एकनाथांच्या ‘मला दादला नको गं बाई’ या भारुडाने उपस्थितांना सांसारिक सुख-दु:खांच्या पलीकडील आध्यात्मिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेकांनी वन्स मोअर करीत हे भारुड पुन्हा ऐकले. यासोबत संत चोखामेळा यांचे ‘जोहार मायबाप जोहार’ हा करुणा व्यक्त करणारा अभंग अत्यंत अभिनव पद्धतीने सादर करण्यात आल्याने त्यावरही उपस्थित थिरकले. तर संत ज्ञानेश्वरांच्या ‘देवाचिये द्वारी उभा क्षण भारी’ या अभंगाने नाट्यगृहातील सर्वजण भक्तिरसात न्हाहून गेल्याचे दिसून आले. ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’ या अभंगातील ‘विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बी घडला, विठ्ठलमय झाला’ म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.