ॲडमिन साहेब, जरा सावधान!
अफवा पसरवल्यास होणार शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे आहे. प्रत्येकजणच समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. त्यामुळे अमुक झाले... तमुक झाले... की ती माहिती आपसूकच सत्यता पडताळणी न करता समाजमाध्यमांवर टाकली जाते. त्यातून जात, धर्म आणि भाषा द्वेष निर्माण करणारे किंवा खोटे वृत्त यांसारख्या अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांनी सावध करण्याचा प्रयत्न करताना, अफवांना बळी न पडता, जागरूक नागरिक बना, असे आवाहन केले आहे. याशिवाय, आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ग्रुप सदस्य, ॲडमिन, निर्माते यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. यात कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ॲडमिन साहेब... जरा सावधान, असेच म्हणावे लागणार आहे. ठाणे शहर पोलिस दलाने नुकतेच ‘डिजिटल वारी’चे प्लॅटफॉर्म ठाणेकरांसाठी सुरू केले आहे.
डिजीटल वारीमध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या समाजमाध्यमांवरील व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) व वेबसाईट या चॅनेलचे क्यूआरकोड नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या अभिनव उपक्रमाद्वारे दिलेले क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या विविध अडचणी समाजमाध्यमांवर पोलिसांना कळवाव्यात, जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकर मात करणे शक्य होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर करताना जरा जपून व योग्य प्रकारेच करावा लागणार आहे. तशी पोस्ट पोलिसांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर टाकली आहे. त्यामध्ये कायदा सर्वांसाठी सारखा आहे. ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, फॉरवर्ड करणे आणि प्रसारित करणे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. असे स्पष्ट करून पोस्ट विचारपूर्वक शेअर करा, जबाबदारीने वागा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणत्या कलमानुसार कोणती शिक्षा?
कलम २९९ (बीएनएस)
धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने पोस्ट टाकणे किंवा शेअर केल्यास
शिक्षा ः तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कलम १९६ (बीएनएस)
धर्म, जात, भाषा यावर द्वेष पसरवणाऱ्या किंवा वैमनस्य वाढवणाऱ्या पोस्ट
शिक्षा ः तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कलम ३५३ (बीएनएस)
एखादे विधान, अफवा किंवा खोटे वृत्त प्रसिद्ध केल्यास
शिक्षा ः तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कलम १५२ (बीएनएस)
भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केल्यास आजीवन कारावासाची शिक्षा आहे.
पोलिस (अप्रितीची भावना चेतवणे) अधिनियम १९२२ कलम ३ अन्वये
सहा महिन्यांपर्यंत कारावास व द्रव्यदंड होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.