भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शेलार ग्रामपंचायतीने घरागणिक दरमहा २०० रुपये अतिरिक्त पाणीबिल आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मंजूर नळजोडणीनुसार नव्हे, तर प्रत्यक्ष घरांच्या संख्येनुसार हे शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी अन्यायकारक शुल्क आकारणीमुळे संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीची थकबाकी वाढल्याने ते भरण्यासाठी आणि पाणीकपात टाळण्यासाठी, हा नवीन नियम लागू केल्याचे ग्रामपंचायतीकडून रहिवाशांना सांगितले जात आहे.
ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासक सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार ग्रामपंचायतीला स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन ॲण्ड इन्फ्रा आणि मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये स्टेमचे मासिक बिल ३.५० लाख रुपये, तर मुंबई पालिकेचे बिल ५९ हजार ९९९ रुपये इतके येते. मात्र, ग्रामपंचायतीकडे निधी नसल्यामुळे स्टेम कंपनीचे २.३५ कोटी रुपये थकीत आहेत. हे बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत. त्यामुळे प्रत्येक नळजोडणीवर दरमहा २०० रुपये बिलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळ व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याच्या वापराऐवजी घराच्या संख्येवर आधारित आकारणी ही अन्यायकारक आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा अपुरा वाटल्यास नवी जोडणी
शुभारंभ पार्क सोसायटी ‘अ’ विंगला नवीन नियमांनुसार एक पत्र जारी केले आहे. त्यामध्ये १६ फ्लॅट असून, पूर्वी आठ नळजोडणी होती. त्यासाठी २०० प्रमाणे १६०० रुपये द्यावे लागतील. मात्र, नवीन नियमानुसार सोसायटीमध्ये १६ फ्लॅटधारक असल्याने ३,२०० रुपये मासिक भरावेत, असा आदेश दिला आहे. एकाच नळजोडणीमधून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, भविष्यात पाणी अपुरे वाटल्यास चौकशी करून नव्याने जोडणी दिली जाईल, असेही नमूद करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.