उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : गणेशोत्सवाचे स्वागत शांततेत, भक्तिभावाने आणि कायद्याच्या चौकटीत व्हावे, यासाठी उल्हासनगरमध्ये प्रशासन, पोलिस आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक पार पडली. टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, सरकारी नियमावली आणि सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर माहिती देत ‘डॉल्बी-डीजेमुक्त उत्सव’ साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीत शेकडो मंडळ प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. यामुळे उत्सवासाठी आवश्यक समन्वय साधला असून, यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
गणेशोत्सव शांततेत, कायदेशीर मर्यादेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील शहीद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृहात महापालिका, पोलिस, शासकीय यंत्रणांची संयुक्त समन्वय बैठक झाली. या वेळी प्रशासन आणि पोलिसांनी उत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी लघुपट आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम मांडले. अतिरेक आवाजामुळे उद्भणारे आजार, लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर होणारे परिणाम अधोरेखित करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य सरकारची नियमावली आणि पोलिस महासंचालकांचे परिपत्रकांची माहिती देऊन ‘डॉल्बी-डीजेमुक्त’ उत्सवाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले.
बैठकीला महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पोलिस उपायुक्त सचिन गोरे, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, उल्हासनगर तहसीलदार कल्याणी कदम, अंबरनाथ तहसीलदार दत्तात्रय पुरी, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, शैलेश काळे; तसेच परिमंडळ-४ मधील आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. याशिवाय शांतता कमिटीचे सदस्य व गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेसंदर्भातील अडचणींवर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीजवितरण कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांनी तत्काळ मार्गदर्शन केले. त्यामुळे मंडळांना मिळालेला प्रतिसाद सकारात्मक होता. शिस्तबद्ध नियोजन, कायद्याचे पालन आणि समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
गणेशोत्सव हा संस्कृतीचा आत्मा आहे. उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांची सोय, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्रशासन सर्व विभागांशी समन्वय साधून ‘डॉल्बी-डीजेमुक्त उत्सव’ यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे. नियम पाळून साजरा होणारा हा उत्सवच खऱ्या अर्थाने आदर्श ठरेल.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा सोहळा आहे. या उत्सवात कायद्याचे पालन, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि नागरिकांची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्व मंडळांनी प्रशासनाशी समन्वय साधून ‘डॉल्बी-डीजेमुक्त उत्सव’ साजरा करण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्ण तयारीत आहे. नियमांचे पालन झाले तर उत्सव निर्विघ्न पार पडेल.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.