राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६१२ कर्मचारी संपावर
शासनात समायोजन करण्याची मागणी
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेले ६१२ कर्मचाऱ्यांनी बुधवार (ता. २०)पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे. सामान्य सेवेवर याचा परिणाम झाला असून जिल्हा रुग्णालयात बुधवार, गुरुवार दिव्यांग प्रमाणपत्र दिवस असतो. यावरही परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनात करून घेत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार, असा पवित्रा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत डॉक्टर, फार्मसी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, समुपदेशक, टेक्निशियन, क्लार्क असे एकूण ६१२ कंत्राटी कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत. गेली अनेक वर्षे कंत्राटी कर्मचारी हे शासनसेवेत घेण्याबाबत आंदोलन, मोर्चा, निवेदन शासनाकडे देत आहेत. याबाबत दीड वर्षांपूर्वी निर्णय झाला असतानाही शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत आहे, असा आरोप राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने केला आहे.
दहा वर्षे पूर्ण झालेल्यांचे १०० टक्के समायोजन करावे, मानधनात १० टक्क्यांप्रमाणे वाढ, तीन ते पाच वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लॉयल्टी बोनस पूर्ववत लागू करावा, १५ हजार ५०० पेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना ईपीएफ ग्रॅच्युइटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू करावी, विमा संरक्षण लागू करावे, आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
आंदोलनाचा परिणाम जाणवणार नाही
जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांनी याबाबत सांगितले, की कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळित होऊ नये, यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यामुळे आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.