प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार
प्रभागरचनेला काँग्रेसचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
विरार ता. २८ (बातमीदार) : राज्य निवडणूक आयोगाने वसई-विरार शहर महापालिकेची प्रभागरचना आणि प्रभागनिहाय मतदारसंख्या जाहीर केल्यानंतर महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदा २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडले जाणार असून, सुमारे ११ लाख ५६ हजार २०९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आहेत. ही रचना जाहीर होताच काँग्रेसने या प्रभागरचनेला विरोध दर्शवला असून, थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील आणि ॲड. जिमी घोन्साल्विस यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामुळे वसई-विरार महापालिकेतील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
विजय पाटील यांनी सांगितले की, शासनाने जीआर काढण्यापूर्वी जी २९ गावे स्वतंत्र होती, ती गेली कित्येक वर्षे महापालिकेत का ठेवली याचे उत्तर शासनाकडे नाही, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर अचानक त्या गावांवर महापालिकेचा अद्यादेश काढण्यात आला. त्यालाच न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आमच्या हरकती फेटाळल्या, त्यालाही आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.
फक्त काँग्रेसच नव्हे, तर बहुजन विकास आघाडीनेदेखील या रचनेवर आक्षेप घेतला आहे. प्रवक्ता अजीव पाटील यांनी सांगितले की, प्रभागरचना करताना नैसर्गिक तत्त्वांचे पालन झाले नाही. अनेक ठिकाणी रस्ते, नाले हे मर्यादा मानून प्रभाग विभागण्यात आले. त्यामुळे प्रभागाचे एकसंधपण हरवले आहे. त्यामुळे आम्हीदेखील हरकत घेणार आहोत. आम आदमी पक्षानेही प्रभागरचनेला विरोध दर्शवला असून, तेही पालिकेत आपली हरकत सादर करणार आहेत.
प्रभागनिहाय मतदारसंख्येचा विचार केल्यास, सर्वाधिक मतदार प्रभाग क्र. १० मध्ये असून, त्यांची संख्या ४६,९८९ आहे, तर सर्वात कमी मतदारसंख्या प्रभाग क्र. २९ मध्ये असून, तेथे फक्त ३४,५४४ मतदार आहेत. ही असमतोल वाटणारी मतदारसंख्यादेखील अनेकांच्या टीकेचा विषय बनली आहे. सध्या या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू आहे. या लढाईचा निकाल काय लागतो आणि यामुळे महापालिकेच्या निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रभागनिहाय मतदारसंख्या
प्रभाग १ ते २८ मध्ये प्रत्येकी चार जागा असून, प्रभाग २९ मध्ये तीन जागा आहेत.
एकूण मतदारसंख्या : ११,५६,२०९
सर्वाधिक मतदार : प्रभाग क्र. १० - ४६,९८९
सर्वात कमी मतदार : प्रभाग क्र. २९ - ३४,५४४
शासनाने जीआर काढण्यापूर्वी २९ गावे स्वतंत्र होती. मग गेले कित्येक वर्ष त्यांना महापालिकेत का ठेवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर घाईघाईत २९ गावे पालिकेत असल्याचा अध्यादेश शासनाने का काढला. त्यालाच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर कोकण आयुक्तांच्या निर्णयही आम्ही आव्हान देणार आहोत.
-विजय पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.
वसई-विरार महानगरपालिकेची प्रभागरचना ही अयोग्य पद्धतीने करण्यात आली आहे. प्रभागरचना करताना नैसर्गिक तत्त्वे पाळली गेली नाहीत. अनेक ठिकाणी रस्ते, नाले याचे विभाजन करून सीमा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभाग एकसंध न राहता विखुरले गेले आहेत. त्यामुळे आम्ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या प्रभागरचनेवर हरकत घेणार आहोत.
-अजीव पाटील, प्रवक्ता, बहुजन विकास आघाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.