त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मराठा आरक्षणाबाबत बैठक बोलावली होती. पण, काही नेते आलेच नाहीत. आता दुटप्पी भूमिका घेत आहेत. मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना मराठा समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री असताना हिम्मत दाखवली असती, तर आज ही वेळ आली नसती, अशी टीकादेखील शिंदे यांनी केली. उल्हासनगर येथील ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते. त्याचा फायदा आजही होत आहे. सारथीमार्फत अनेक योजना राबवल्या, बिनव्याजी कर्ज दिले, वसतीगृह उपलब्ध करून दिले. यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जात आहेत. मात्र, महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्यानुसार टिकले पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला देण्याची कोणाचीच भूमिका नाही. शक्य आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून नक्की दिले जाईल, असे ही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
खेळाडू घडवण्याचे कामही करतो
क्रीडा क्षेत्राचा उल्लेख करत शिंदे म्हणाले. आम्ही फक्त विकासकामेच करत नाही, तर खेळाडू घडवण्याचे कामही करत आहोत. खेळाडूंच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे. हरभजन सिंग यांनी खासदार क्रीडा संग्रामाचे उद्घाटन केले आहे. ठाकरे गटाची धडपड आता पडझडीत परिवर्तित झाली असून त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत. म्हणूनच त्यांच्याकडे कोणी उरले नसल्यची टीका देखील शिंदे यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.