पालघर, ता. ९ (बातमीदार) : लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणे हा समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश आहे. या अभियानातून ग्रामविकासाची गती वाढणार असल्याचा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अपूर्वा बासूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि समृद्ध गाव या संकल्पनेतून विकसित व विकसनशील पंचायत निर्माण करण्यासाठी ठोस नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. ढगफुटी, पावसाच्या बदलत्या पद्धती, निसर्गातील असमतोल यावर उपाय म्हणून झाड लावणीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राज्यात २५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट राबविले जात असून, टिश्यू कल्चरच्या माध्यमातून दर्जेदार रोपे निर्माण केली जातील, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
सामूहिक प्रयत्न आवश्यक
ग्रामपंचायतींनी प्लॅस्टिकमुक्त गाव, स्वच्छता उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, शेतकरी व कामगार कल्याण, रोजगार निर्मिती या क्षेत्रांत ठोस काम करणे गरजेचे आहे. जात, धर्म, भाषा या भिंती पाडून माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समाधान निर्माण होणे, हेच पंचायतराज व्यवस्थेचे खरे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. पालघर जिल्हा शिक्षण, आरोग्य व ग्रामविकासाच्या क्षेत्रात राज्यात आघाडीवर यावा, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही नाईक यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.