परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट
वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर ः शेकडोंची संधी हुकली
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली पालिकेची नोकर भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या इच्छुक परीक्षार्थींना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर झाल्याने सुमारे १५० परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींनी पालिका मुख्यालयात जाऊन आपला संताप व्यक्त करीत पालिका आयुक्तांच्या नावे नागरी सुविधा केंद्रात निवेदन दिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध पदांकरिता नोकरी भरतीसाठी मंगळवारी (ता. ९) परीक्षा घेण्यात आली होती. दुसऱ्या सत्रातील दुपारी एक ते तीन या कालावधीत टंकलेखक आणि लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी साडेअकरा ते साडेबाराच्या आत परीक्षा केंद्रात घेतले जात होते. दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे अनेक परीक्षार्थी मुंबईतील पवई येथील परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नसल्याने त्यांना आत घेतले नाही. त्यामुळे त्यांची परीक्षेची संधी हुकली. त्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. त्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात धाव घेतली होती.
परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या श्रुतिका म्हैसकर यांनी सांगितले, की त्या कल्याणमध्ये राहतात. त्यांनी पालिकेच्या नोकर भरतीची जाहिरात पाहून अर्ज भरला होता. त्यानुसार मंगळवारी पवई येथे परीक्षा होती. त्या ठिकाणी पाच मिनिटे उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही.
फेरपरीक्षा घेण्याकरिता
परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींनी बुधवारी पालिकेच्या मुख्यालयात फेरपरीक्षा घेण्याकरिता पालिका आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान, पालिकेमध्ये शासनाच्या अनुचित जमाती कल्याण समितीच्या शिष्टमंडळाचा दौरा असल्याने या शिष्टमंडळाच्या सरबराईसाठी आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची लगबग सुरू असल्याने परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींना त्यांची भेट मिळू न शकल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत पालिका आयुक्ताची भेट होईल, असे आश्वासन मिळेल या आशेवर वंचित परीक्षार्थी ताटकळत उभे होते.
फक्त १ मिनिट उशीर
मयूर राठोड यांनी सांगितले, की वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता आले नाही. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास फक्त १ मिनिट उशीर झाला, तरी त्यांनी परीक्षा केंद्राच्या आत घेतले नाही. त्यामुळे परीक्षा देता आलेली नाही. आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे. दिव्या सपकाळ यांनी सांगितले, की पालिकेच्या नोकर भरतीची परीक्षा होती. वाहतूक कोंडीमुळे जवळपास १५० जण परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. त्यांना परीक्षा केंद्रात शिरू दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.