भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाका वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी स्थलांतर केला जाणार आहे, मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केला आहे, तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनीदेखील स्थलांतराची जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत असल्याने त्याजागी टोलनाका स्थलांतर करण्यास परवानगी न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर टोलनाका स्थलांतराची जागा अद्याप निश्चित झालेली नाही, तसेच नाईक यांचा स्थलांतरासंदर्भात झालेला गैरसमज दूर करू, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दहिसर टोलनाक्यावरील प्रचंड कोंडीमुळे मिरा-भाईंदरच्या नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी टोलनाका वरसावे येथील वसई खाडीपुलाच्या दिशेने दोन किमीवर स्थलांतर करण्यात येणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी केली होती. त्या वेळी वरसावे पुलाजवळ टोलनाका स्थलांतर करण्याचे सूतोवाच सरनाईक यांनी केले होते, मात्र या स्थलांतरावरून वादाला तोंड फुटले आहे. टोलनाका स्थलांतराला घोडबंदर ग्रामस्थांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत टोलनाका नक्की करण्यात आलेल्या जागेत स्थलांतर करू दिला जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दुसरीकडे भूमिपूत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर नवी मुंबईत झालेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली होती. त्या वेळी टोलनाका स्थलांतराची जागा गांधी उद्यानात समाविष्ट आहे. त्यामुळे या टोलनाक्याचा स्थानिकांना त्रास होणार असेल, तर परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका नाईक यांनी जाहीर केली होती.
लोकप्रतिनिधींकडूनही विरोध
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनीदेखील टोलनाका सध्याच्या ठिकाणाहून लगत मुंबई महापालिकेच्या सध्या मोकळ्या असलेल्या जागेत स्थलांतर करावा, अशी मागणी केली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी टोलनाका स्थलांतराचे स्वागत केले आहे, मात्र जागा चुकीची आहे, अशी भूमिका घेतली आहे. टोलनाका स्थलांतराला होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेता स्थलांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थलांतराची जागा निश्चित नाही!
मिरा-भाईंदरच्या नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता टोलनाका स्थलांतर होणारच, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले, मात्र जागा अद्याप नक्की झालेली नाही. स्थलांतराच्या जागेची पाहणी केल्यानंतर आपण दोन ते तीन ठिकाणे सुचवली आहेत. त्यानंतर आता पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. कोंडी होणार नाही व स्थानिकांना त्रास होणार नाही, अशी जागा निश्चित केली जाईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
कोंडी होणार नाही!
टोलनाक्याच्या स्थलांतराने अवजड वाहने घोडबंदर गावात शिरतील, ही ग्रामस्थांची भीतीही व्यर्थ आहे, असे सांगून सरनाईक यांनी सांगितले की, टोलनाक्याच्या स्थलांतरानंतर घोडबंदर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर उंची मर्यादा कमानी बसविण्यात येतील, जेणेकरून अवजड वाहने घोडबंदर गावात शिरणार नाहीत, तसेच ठाणे, वसईकडे जाणाऱ्या स्थानिक व्यावसायिक वाहनांना टोलचा भुर्दंड बसू नये, यासाठी त्यांना पास देण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली जाईल.
वनमंत्र्यांचा गैरसमज दूर करणार!
वनमंत्री नाईक यांनी घेतलेल्या स्थलांतराला परवानगी दिली जाणार नाही, या भूमिकेवर सरनाईक यांनी सांगितले की, ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना योग्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा या विषयावर गैरसमज झाला आहे. टोलनाक्याचा मिरा-भाईंदरच्या नागरिकांना होत असलेला त्रास नाईक यांना समजावून दिला, तर ते स्थलांतराला विरोध करणार नाहीत, याची आपणाला खात्री आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करू, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
मुंबई महापालिकेची जागा शिल्लक नाही
टोलनाका सध्याच्या जागेलगत असलेल्या मुंबई महापालिकेच्या जागेत स्थलांतर करण्याच्या मागणीवर सरनाईक यांनी स्पष्ट केले की, या जागेसंदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली, मात्र ही जागा महापालिका स्वत:च्या कामासाठी वापरणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया होऊन कार्यादेश देण्यात आले आहेत, अशी माहिती गगराणी यांनी दिली. त्यामुळे टोलनाका त्याजागी स्थलांतर करता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.