अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : अंबरनाथ पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघड झाला आहे. जावसई परिसरातील एका रस्त्यासाठी तब्बल चार वेळा बिल मंजूर झाले, तर दुसऱ्या रस्त्याचे काम न करताच बिल पास झाल्याचा धक्कादायक खुलासा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अंबरनाथ पश्चिम (वॉर्ड १) येथील डिफेन्स कॉलनी ते वाघवाडी रस्ता आणि ठाकरे कॉम्प्लेक्स ते ठोकल यांच्या घराकडे जाणारा रस्ता अशा एकाच रस्त्यासाठी चार वेळा बिल पास झाल्याचे भाजपचे पदाधिकारी पाटील कुटुंबीयांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांचा दाखला देत सांगितले. शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम केले गेलेले नाही, तरी बिल पास झाले. वास्तविक काम जावसई येथील हनुमान मंदिरापासून पुढे एकदाच झाले आहे. या रस्त्याचे बिल चार वेळा मंजूर केले.
सात-आठ वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता पावसाळ्यात वाहून गेला असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, दुचाकी वाहन, वृद्ध, गर्भवती महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे अपघातही झाले आहेत. शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखल मातीमुळे नागरिकांचे पाय घसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. भाजप पदाधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही पालिकेने काही ठोस पावले उचलली नाहीत. माजी नगरसेविका वंदना पाटील यांनी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागरिक रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करत आहेत.
संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली.
एकदाच काम केलेल्या रस्त्यासाठी चार वेळा बिल पास झाले; तर एका न बनवलेल्या रस्त्यासाठीही बिल पास झाले आहे. ही नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे. अंबरनाथ पालिकेत प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच याप्रकरणी योग्य कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा उपोषण व तीव्र आंदोलन करू.
- वंदना पाटील, माजी नगरसेविका, भाजप
आम्ही माहितीच्या अधिकारातून व पालिकेने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा भ्रष्टाचार उघड करत आहोत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, पालिका मुख्याधिकारी चौकशीसाठी टाळाटाळ करत असल्याचा संशय आहे. मुख्याधिकारी या प्रकरणात ठोस भूमिका घेत नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. हा मोठा भ्रष्टाचार असल्याने याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- जितेंद्र पाटील, भाजप पदाधिकारी
अंबरनाथ : डिफेन्स कॉलनी ते वाघवाडी रस्ता आणि ठाकरे कॉम्प्लेक्स ते ठोकल रस्त्याचे बिल मंजूर करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.