भातकापणीची लगबग सुरू
मजूर टंचाईची चिंता; सुताराकडून अवजारे तयार करण्यासाठी गर्दी
तळा, ता. ८ (बातमीदार) ः जिल्ह्यामध्ये भातकापणीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी मजुरांची जमवाजमव, अवजारांची तयारी करू लागले आहेत. यंदा परतीच्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले असून, भाताच्या लोंबी चिखलात पडलेल्या आहेत. त्या जमा करण्यासाठी जादा मनुष्यबळाची गरज भासणार आहे. अशात, जिल्ह्यात मजुरांची टंचाई भासत आहे.
रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ९७ ते ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. चांगल्या पावसामुळे भाताचे पीकही जोमदार आले. त्यामुळे शेतकरी आनंदी होते, मात्र ऐन कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरीही, आता पाऊस थांबल्यामुळे कापणीच्या हालचालींना वेग आला आहे.
पावसाचे प्रमाण कमी होऊन सकाळच्या दरम्यान धुके पसरू लागले आहे. हे वातावरण भातकापणीला ठकत असल्याचे संकेत मिळत आहेत. भातकापणी वेळेवर झाल्यानंतर तांदूळ अखंड निघतो व त्याचा उतारा चांगला मिळतो. म्हणून पीक कापण्यासाठी येथील शेतकरी मनुष्यबळाची जमवाजमव करू लागला आहे.
सुताराकडे गर्दी
भातकापणीसाठी येथे पारंपरिक अवजारे वापरण्याची पद्धत आहे. लहान आणि वजनाने हलकी विळे, खराळे, कोयत्या पाजवणे आणि त्यांना लाकडाच्या मुठी घालण्यासाठी सुताराच्या कार्यशाळेत गर्दी होतना दिसत आहे. भातकापणीला जास्तीत जास्त लोकांचा हातभार लागावा यासाठी घरातील सर्व अवजारे तयार ठेवली जातात. ही अवजारे तयार करुन घेण्यासाठी सुताराच्या कार्यशाळेत दिवस-रात्र काम सुरू झाला आहे.
मजुरांची जमवाजमव
यंदा मनुष्यबळाची जास्त गरज भासणार आहे. लवकरात लवकर भातकापणी, मळणी करण्यासाठी मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होण्यासाठी महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. नवी पिढी शेतात काम करण्यास तयार होत नसल्याने मजुरांचा खूपच तुटवडा भासत असतो. त्यामुळे नातलग, गावातील गरजू लोक यांच्याशी संधान बांधून कापणीसाठी वेळेत मनुष्यबळ मिळवण्याची व्यवस्था करावी लागत आहे. आदिवासी लोकांना उसणवारी पैसे देण्याचीही पद्धत काहीजण येथे वापरत आहेत.
भात पेरणी, लावणी पुढेमागे झाली तरी चालते, परंतु कापणी मात्र वेळेत होणे गरजेचे असते. चार-पाच महिने केलेली मेहनत एका दिवसाच्या विलंबाने वाया जाण्याची शक्यता असते. मजूर मिळाले नाहीत तरी सकाळी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत कंबर वाकवून कापणी करावी लागते. चिखल आणि वरून जाणवणाऱ्या ऑक्टोबर हिटमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कापणी आणि त्यानंतर मळणीला उशीर होतो. यासाठी आधीपासूनच तयारी करून ठेवावी लागते.
- शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.