पितृपक्षात ४० जोडपी विवाहबद्ध
पितृपक्षाचा संकेत मोडला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ ः हिंदू धर्मात पितृपक्ष हा मृतात्म्यांची शांती आणि मोक्षासाठी प्रार्थना करण्याचा हा पंधरवडा असतो. त्यामुळे कोणत्याही शुभकार्यासाठी निषिद्ध समजला जातो; मात्र आधुनिक जीवनशैली आणि वेळेच्या अभावी पारंपरिक संकेतांना बाजूला सारत, यंदाच्या पितृ पंधरवड्यातही ठाणे जिल्ह्यात ४० विवाहेच्छुक कायदेशीररीत्या विवाहबंधनात अडकले आहेत. दुय्यम निबंधक विभागाकडील अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रूढ होत असलेला हा नवीन सामाजिक ट्रेंड परंपरा विरुद्ध आधुनिकता या संघर्षाचे स्पष्ट संकेत देत आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये लग्नासारख्या महत्त्वाच्या शुभकार्यासाठी साडेतीन मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या मुहूर्तांवर केवळ विवाहच नव्हे, तर वाहन, गृह किंवा सोने खरेदीसारखी शुभ कामे केली जातात. याउलट, पितृपक्ष म्हणजे पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण अर्पण करण्याचा काळ असतो. त्यामुळे लग्नासारख्या आनंदी समारंभ केला जात नाही. या काळात लग्न केल्यास नवदाम्पत्याच्या वैवाहिक जीवनात पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही, किंबहुना त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी पारंपरिक धारणा आहे. त्यामुळे अनेक शतकांपासून धार्मिक हिंदू कुटुंबांनी पितृपक्षात विवाहाचे कोणतेही कार्य करणे टाळतात; मात्र ठाण्यातील ४० जोडप्यांनी आधुनिकता जपत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
ठाणे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते, की वेळेअभावी, शिक्षणामुळे किंवा परदेश प्रवासाच्या आवश्यकतेमुळे या ४० जोडप्यांनी धार्मिक नियमांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक गरजांना अधिक महत्त्व दिले आहे. आजच्या पिढीसाठी विवाहाचा अर्थ हा धार्मिक विधी आणि मुहूर्तापेक्षा कायदेशीर मान्यता आणि सोय यामध्ये अधिक दडलेला आहे. परंपरेला फाटा देऊन स्वतःच्या सोयीनुसार शुभ कार्ये करण्याची ही नवीन रीत, समाजाच्या बदलत्या प्राधान्यक्रमांची दिशा दर्शवते. आजच्या धकाधकीच्या आणि भौतिकवादी जीवनात अनेक कुटुंबांना या पारंपरिक संकेतांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. या बदलामागे अनेक व्यावहारिक कारणे आहेत.
नोकरी आणि करिअर
अनेक विवाहेच्छुक तरुण-तरुणींना नोकरीनिमित्त देशात किंवा परदेशात स्थलांतर करावे लागते. विवाहानंतर त्वरित परदेशात जायचे असल्यास, व्हिसाची प्रक्रिया किंवा कामावर रुजू होण्याची तारीख महत्त्वाची ठरते. त्यामुळे शुभ मुहूर्ताची वाट पाहणे त्यांना परवडत नाही.
वेळेचे नियोजन
अनेक कुटुंबे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ किंवा मोठी समारंभे आयोजित करतात, ज्यासाठी मोठी सुट्टी किंवा उपलब्ध जागा महत्त्वाची ठरते. केवळ धार्मिक मुहूर्तावर अवलंबून न राहता, कुटुंबातील सदस्य कधी उपलब्ध आहेत, याला प्राधान्य दिले जाते.
कायदेशीर सोपस्कार
अनेक प्रेमीयुगुल कुटुंबाच्या विरोधामुळे किंवा आंतरधर्मीय विवाह कायद्यानुसार केवळ कायदेशीर विवाह (रजिस्टर मॅरेज) करतात, ज्यात धार्मिक विधी आणि मुहूर्ताला दुय्यम स्थान मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.