वालधुनी नदी पुन्हा विषारी
एमआयडीसीतील कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी
अंबरनाथ, ता. ९ (वार्ताहर) ः अंबरनाथ शहरालगतच्या वालधुनी नदीवर पुन्हा एकदा प्रदूषणाचे मोठे संकट ओढवले आहे. आनंदनगर एमआयडीसी परिसरातील काही केमिकल कंपन्यांनी थेट नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने नदीचे पाणी पुन्हा विषारी झाले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, उग्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच वालधुनी नदीवर पिवळा तवंग दिसला होता, ती घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. ८) रात्री उशिरा पुन्हा एकदा नदीत रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले. हे सांडपाणी वाहत जाऊन गोविंद तीर्थ पुलाजवळ पोहोचले असून काल रात्रीपासून नागरिकांना उग्र दर्पाचा त्रास होत आहे. पूर्वीच्या घटनेवेळी पोलिसांनी केवळ ‘शोध घेतो’ असे आश्वासन देऊन प्रकरण थंड केले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार कारवाई होऊनही काही कंपन्या बिनधास्तपणे सांडपाणी सोडत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील हवा आणि पाणी दोन्ही दूषित होत असून, नागरिकांना आरोग्यविषयक त्रासाचा धोका निर्माण झाला आहे; मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कारखान्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आता केवळ दंड किंवा अल्पकालीन कारवाई न करता, अशा कंपन्यांवर कठोर गुन्हे दाखल करून त्या कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. निर्णायक आणि कठोर कारवाई झाल्याशिवाय नदी-नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराला आळा बसणार नाही, असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे आता तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.