पडघा, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठी विकासकामांवर खर्च करणे बंधनकारक असलेला १५ टक्के निधी चार वर्षांत एप्रिल २०२२ ते जुलै २०२५ या काळात खर्चच केला नाही, असा अत्यंत धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. माजी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारमुळे मागासवर्गी वस्ती विकासापासून वंचित राहिल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.
मिलिंद जाधव यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या तपशिलानुसार, बोरीवली ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठी एकूण २३ लाख रुपयांची तरतूद केली होती; परंतु त्यापैकी केवळ दोन लाख सात हजार ६३२ रुपयेच खर्च झाले आहेत. म्हणजेच, चार वर्षांत फक्त नऊ टक्के निधी खर्च झाला आहे. खर्च न झालेल्या या निधीला सेवेतून बडतर्फ झालेले तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आर. जे . म्हस्के यांच्या बेजबाबदारमुळे मागासवर्गीय वस्ती वंचित राहिल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
निधी खर्च न झाल्यामुळे समतानगर बौद्ध वस्तीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षांपासून आमच्या हक्काचा निधी खर्च केला नाही, त्यामुळे दलित वस्तीचा विकास थांबला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
पुढील काळात खबरदारी घेऊ!
निधीबाबत ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, मागासवर्गीयासाठीचा निधी त्यांच्या विकासासाठी वापरला पाहिजे होता. पुढील काळात याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे सांगितले.
पावत्याही नाहीत
खर्च झालेल्या रकमेपैकी तब्बल एक लाख १२ हजार ६३२ रुपयांच्या पावत्या ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठी असलेला १५ टक्के निधी खर्च केला नाही. त्यामुळे हा निधी २०२५ पूर्वी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी वापरावा, अशी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपले सरकार पोर्टलवरून केली आहे.
- मिलिंद जाधव
वर्ष तरतूद (रु.) खर्च (रु.)
२०२२-२३ ५ लाख ०
२०२३-२४ ५ लाख ३५ हजार
२०२४-२५ ६.५ लाख १,७२,६३२
२०२५-२६ (जुलैपर्यंत) ६.५ लाख ०
एकूण २३ लाख २,०७,६३२
पडघा : बोरीवली ग्रामपंचायतीने चार वर्षे मागासवर्गीय निधी खर्च केला नसल्याची बाब उघडकीस आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.