वऱ्हाळा तलाव प्रदूषित
दुर्गंधीविरोधात आंदोलनाचा इशारा; कामतघर ग्रामस्थांकडून आयुक्तांना निवेदन
भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : भिवंडी शहरातील ऐतिहासिक व एकमेव पर्यटनस्थळ असलेल्या वऱ्हाळा तलावात तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट सांडपाणी मिसळत असल्याने तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामतघर ग्रामस्थांनी तेजस मनोज काटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी येत्या १५ दिवसांत तलावातील दुर्गंधी बंद करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तलावाचे व्यवस्थापन कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावे, असा इशारा दिला आहे.
जुने भिवंडी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराला याच तलावातून दररोज पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मानसरोवर, फेणेगाव आणि भाग्यनगर परिसरातील नागरी वस्तीचे ड्रेनेजचे पाणी थेट तलावात सोडले जात असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. यामुळे मंडई, गौरी पाडा, वाणी आळी, ब्राह्मण आळी, सौदागर मोहल्ला, तांडेल मोहल्ला या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधींचा खर्च करून तलावात बांधलेल्या तीन विसर्जन घाटांचीही दुरवस्था झाली आहे. विसर्जन घाटांसाठी अडवलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पसरल्याने तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तवंग साचला असून, त्याला उग्र दर्प येत आहे. या दुर्गंधीमुळे स्थानिक कामतघर ग्रामस्थांसह तलावाजवळून जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तेजस मनोज काटेकर यांनी इशारा दिला आहे की, ‘‘येत्या १५ दिवसांत पालिका प्रशासनाने तलावात येणारे सांडपाणी बंद न केल्यास कामतघर ग्रामस्थ स्वतः तलावात घाण पाणी येणारी ठिकाणे बंद करतील आणि तलावाचे व्यवस्थापन स्वतःच्या ताब्यात घेतील.’’
तीन महिन्यांत सांडपाणीर बंद करणार
वऱ्हाळादेवी तलावात वाहणारे ड्रेनेजचे पाणी थांबवून जलप्रदूषण थांबवण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभागाने संयुक्तपणे काम सुरू केले आहे. आयुक्त अनमोल सागर यांनी माहिती दिली की, तीन ठिकाणी सांडपाणी अडवून ते नव्या ड्रेनेज लाइनसोबत जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. याशिवाय, तलावात अंघोळ करण्यास आणि वाहने धुण्यास मनाई करण्यासाठी विसर्जन घाटांवर बॅरिकेड्स बसवले जाणार आहेत. त्यासाठी २५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नागरिकांनीही तलावात निर्माल्य, घाण आणि कचरा टाकू नये, असे आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.