वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार शहर कोंडीच्या कचाट्यात सापडत आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडत असल्याने प्रवासी त्रासले आहेत. वाहनांच्या प्रचंड रांगा, कामावर जाण्यास आणि घरी येण्यास उशीर, इच्छितस्थळी पोहोचण्यास येणारी अडचण डोकेदुखी ठरू लागली आहे. या समस्यांना कुणी वाली आहे का, असा सवाल सुजाण नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
विरार उड्डाणपूल, नारिंगी, चंदनसार, माणिकपूर, सातिवली, वालीव, वसई फाटा, तुळिंज, संतोष भुवन, औद्योगिक वसाहतीकडे जाणारे मार्ग यासह शहरातील अंतर्गत मार्गावर कोंडी होऊ लागली आहे. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. हजारोंच्या संख्येने चाकरमानी, मालवाहतूक करणारी अवजड वाहनांची वर्दळ असते, परंतु इच्छितस्थळी जाण्यासाठी विलंब होतो. एकीकडे रस्ते रुंदीकरण, दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, तरीही कोंडीचा विळखा घट्ट होत आहे.
वसई-विरार शहरात कोंडीची समस्या डोके वर काढत आहे. त्यामुळे याबाबत उपाययोजना करून नागरिकांना कोंडीमुक्त करा आणि मोकळा श्वास घेत प्रवास करू द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबत प्रशासन कोणती कार्यवाही करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
फेरीबोटीसाठीही रांगा
वसई, नालासोपारा आणि विरार येथील वाहनचालक शहरांतर्गत व महामार्गावर कोंडी असल्याने वसई गावात वाहने घेऊन रो-रो फेरी बोटीचा आधार घेत आहेत, परंतु तिथेदेखील रांगा लागत आहेत. त्यामुळे वसई ते भाईंदर प्रवास करण्यासाठी वाट पाहत थांबावे लागत आहे.
महामार्गावर तिसऱ्या दिवशी कोंडीच
रस्ते मार्गाचा वापर करून प्रवासी हे ये-जा करत असतात, परंतु शहरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेले तीन दिवस वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे परिस्थितीत असल्याने प्रवास करायचा तरी कसा, असा सवाल नागरिकांतून निर्माण होऊ लागला आहे.
अत्यावश्यक सेवांना फटका
रुग्णांना ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, डॉक्टरांच्या वाहनांनादेखील वाट मिळत नाही. अत्यावश्यक सेवांना कोंडीचा फटका बसू लागला आहे.
शहरात, तसेच महामार्गावर कोंडी असल्याने रो-रो फेरी बोटीसाठी मार्ग पत्करला, परंतु तिथेही वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे समुद्रमार्गे भाईंदरपर्यंत जाण्यासाठी फेरीची वाट पाहावी लागते.
- अजिल चाको, प्रवासी
वसईतून प्रवास करताना कोंडीतून वाट काढताना कसरत करावी लागते. त्यामुळे कामावर जाण्यासाठी व घरी परतताना वेळ खर्ची घालावा लागतो. इंधनदेखील जास्त लागते. वाहतूक व्यवस्था सुधारणेबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.
- काकासाहेब मोटे, माजी सदस्य पंचायत समिती, शिवसेना ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.