मूर्धा खाडीचा श्वास गुदमरला
अतिक्रमणे व कांदळवनाची कत्तल सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : भाईंदरजवळील मूर्धा खाडीत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत असून, कांदळवनाची कत्तल करून अतिक्रमणे सुरूच आहे. यामुळे खाडीचा श्वास गुदमरू लागला आहे. कांदळवन समितीने सोमवारी (ता. ३) केलेल्या पाहणीनंतर ही बाब उघड झाली.
भाईंदर व आसपासच्या परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याचा मूर्धा खाडी हा एकमेव मार्ग आहे. परंतु अतिक्रमणांमुळे खाडीपात्र अरुंद होत असल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होऊ लागला आहे. परिणामी शहरात पूरस्थिती निर्माण होते. खाडीपात्राची गंभीर स्थिती झालेली असतानाही महापालिका प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
मूर्धा खाडीच्या काठावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यातील राडारोडा व कचरा पात्रात टाकला जात आहे. झोपड्यांची बांधकामे केली जात आहेत. त्यात कांदळवनाचीही कत्तल केली जात आहे. झोपड्यांमधून बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांचे मलमूत्रही याच खाडीपात्रात सोडले जाते. तसेच कचराही नागरिक येथेच टाकत असल्याने खाडीपात्र पूर्णपणे गाळाने भरून प्रदूषित झाले आहे. खाडीतील या अनधिकृत बांधकामांना काही स्थानिक नेत्यांचा आशिर्वाद असल्याने महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. याचा नाहक त्रास भाईंदर आणि लगतच्या मूर्धा गावातील रहिवाशांना सोसावा लागत आहे.
शेती आणि मिठागराला फटका
शहरातील नालेसफाईवर महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र प्रशासनाकडून मूर्धा खाडीच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरात पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे. दुसरीकडे खाडीतून पाणी वाहून जात नसल्याने मूर्धा गावातील शेतीदेखील धोक्यात आली आहे. पावसाचे पाणी खाडीत न जाता शेतातच तुंबून राहत असल्याने पिके कुजून जातात. याचा फटका मिठागरांनाही बसत आहे. खाडीपात्रातील अतिक्रमणे हटवावी व खाडीपात्र रुंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून त्यावर कोणतीही हालचाल केली जात नाही.
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी
सोमवारी (ता. ३) कांदळवन समितीने खाडीपात्राची पाहणी केली. या वेळी स्थानिक तलाठी, कांदळवन कक्षाचे वनरक्षक, मिरा भाईंदर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन, पर्यावरणप्रेमी रोहित सुवर्णा, धीरज परब यांच्यासह मूर्धा ग्रामस्थही उपस्थित होते. या वेळी खाडीपात्रात होत असलेला भराव व अतिक्रमणे यावर समितीच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी समितीने केली आहे.
मिरा भाईंदर शहरातील नैसर्गिक नाले, खाड्या यावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात तसेच कांदळवन कत्तलीसंदर्भात लवकरच एक बैठक बोलावून आढावा घेण्यात येईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.