गोराई, चारकोप येथील नव्या जलवाहिन्या कार्यान्वित होणार
खासदार पीयूष गोयल यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना दिलासा
मुंबई, ता. १० : खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि विविध भागांमध्ये समसमान पाणी वितरण सुनिश्चित करण्यासाठी पाण्याच्या दाब मापक यंत्रांची स्थापना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. गोराई पंपिंग स्टेशन येथे पंपसेट्स बसविण्याचे काम सुरू असून, ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे गोराई-चारकोप परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
खासदार पीयूष गोयल यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पालिका अधिकाऱ्यांनी पाणी दाब मापक यंत्रे बसविण्याचा आराखडा प्राधान्याने तयार करण्याबाबत आणि गळती, दूषित पाणी अशा पुरवठा समस्यांचे निराकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. समसमान पाणी वितरणाव्यतिरिक्त, ही यंत्रे पाण्याच्या दाबात होणारे फरक किंवा घट त्वरित ओळखण्यात, गळतीचे ठिकाण शोधण्यात मदत करतील. या भागासाठी सुमारे १६,९०० मीटर नवीन जलवाहिन्या बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या, त्यापैकी सुमारे १६,३०० मीटर जलवाहिनी आधीच टाकण्यात आली आहे. दरम्यान, गोयल यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळेवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही पालिका अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, उत्तर मुंबईतील पाणीपुरवठा सात झोनमध्ये विभागलेला असून, त्यापैकी तीन झोनमध्ये गंभीर समस्या आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील मगरीथाणे (पश्चिम), दहिसरचे काही भाग, कांदिवली (पश्चिम) आणि मालाड (पश्चिम) मधील मार्वे परिसर या टेकडीवरील भागांबाबत पाणीटंचाईची माहिती गोयल यांना देण्यात आली. या भागांमध्ये पाण्याचा पुरवठा कांदिवली येथील महावीर नगर येथून सुमारे १६ किमी अंतरावरून केला जात असल्याने पाण्याच्या दाबात मोठी घट होत असल्याचे समोर आले. त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. पीयूष गोयल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि हस्तक्षेपामुळे उत्तर मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी नेहमीच स्पष्ट राहिली आहे. पाणी ही केवळ एक मूलभूत गरज नसून लोककल्याण आणि नागरी प्रगतीचा कणा आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेले जल जीवन मिशन या राष्ट्रीय संकल्पाला ‘हर घर नळ, हर घर जल’ या ध्येयवाक्यासह बळकटी देत आहे, या योजनेमुळे प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर पिण्याचे पाणी पोहोचत आहे. या दृष्टीने मार्गदर्शित होऊन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मजबूत पाठबळासह, आपण गळती, दूषितपाणी आणि टंचाई दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहोत. या उपाययोजना ‘उत्तर मुंबई ते उत्तम मुंबई’ या आमच्या ध्येयाचा केंद्रबिंदू आहेत.
- पीयूष गोयल, खासदार
..
नालेसफाईची कामे सुरू
गोराई-चारकोप येथील नालेसफाईची कामे सुरू असून, ते पुढील ३० दिवसांत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पाणीपुरवठा आणि रस्ते विभाग संयुक्तरीत्या अंतिम जोडणी आणि चाचणी करतील. याशिवाय, संबंधित विभागांनी सेक्शन टँक आणि पंप रूमचे बांधकाम पूर्ण केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.