मुंबई भाजपचा उत्साह दुणावला
बिहारच्या निकालाचा पालिका निवडणुकीवर परिणाम!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे मुंबई पादाक्रांत करण्यासाठी भाजपचा उत्साह दुणावला आहे. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना या विजयाने बळ मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारच्या यशाचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. पालिका निवडणुकीत बिहारी मतदार भाजपच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
बिहारच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे लागले आहे. मुंबई जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून भाजप कामाला लागली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्रे भाजपने अमित साटम यांच्याकडे दिली आहेत. यासाठी त्यांनी मुंबई पिंजून काढली असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध समाज घटकांमध्ये पोचण्यासाठी आमदार, खासदार, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. त्यातच आता बिहारच्या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. यासाठी भाजप मुंबईत १५०पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
बिहारी मतदार भाजपच्या पाठीशी!
बिहारी मतदार भाजपच्या पाठीशी राहिला त्यामुळे भाजपला भरघोस यश मिळाले. मुंबईतून मोठ्या प्रमाणात बिहारी मतदार तेथील निवडणुकीसाठी गेले होते. बिहारमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर बिहारी आता मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. परिणामी बिहारींची व्होट बँक भाजपच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे.
..
व्होट चोरीचे फेक नॅरेटिव्ह बिहारच्या जनतेने उधळून लावले. विरोधकांनी केलेले व्होट चोरीचे आरोप म्हणजे जनतेचा अपमान आहे. बिहारच्या जनतेने निकालातून उत्तर दिले आहे. बिहारची निवडणूक म्हणजे ट्रेलर असून, खरा पिक्चर मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल.
- अमित साटम, अध्यक्ष, मुंबई भाजप
मतदार याद्यांमधील घोळ राहुल गांधी यांनी वारंवार जनतेसमोर मांडले होते. बिहारमधील निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडली नाही, हे स्पष्ट झाले. आज लागलेला निकाल हा जनतेचा कौल आहे की निवडणूक आयोगाचा? अशा निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाहीला धोका मात्र निर्माण झाला आहे. आज तो जाणवत नसला तरी पुढच्या पिढ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.
- वर्षा गायकवाड, खासदार, अध्यक्ष, कॉँग्रेस, मुंबई
..
बिहार विधानसभेच्या निकालात लबाडी आहे. मतदान वाढवले आहे. सत्तेचा गैरवापर आणि निवडणूक आयोग खिशात घालून हा निकाल आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आपली शक्ती निवडणुकीत वाया घालवू नये. ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत असेच निकाल येत राहणार. मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) निवडणूक घ्या तरच लोकशाही वाचेल.
- विद्या चव्हाण, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)
बिहारचा निकाल अपेक्षित असाच आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये निकाल लागला आहे. लोकशाहीचा हा घात आहे. मुंबई महापालिकेत हेच होणार आहे. जोपर्यंत ईव्हीएम आहे आणि निवडणूक आयोग सरकारच्या प्रभावाखाली आहे तोपर्यंत निवडणुकीला अर्थ नाही.
- हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.