रिक्षाचालक, फेरीवाल्यांचा वेढा
विरार स्थानक परिसरात कोंडी
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १९ : पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्थानक म्हणून विरारकडे आतापर्यंत पाहिले जात होते. पूर्वी गाव असलेल्या विरारच्या कायापालट होऊन त्याचे रूपांतर शहरात झाले. या स्थानकाभोवती रिक्षा, बस यांचा गराडा पडला. त्यात आता रहदारीच्या रस्त्यावर उभारलेल्या स्कायवॉकची भर पडली आहे; मात्र वाहतूक पोलिसांनी एक मार्ग वाहतूक केल्याने आता विरार स्थानक मोकळा श्वास घेऊ लागले आहे. असे असले तरी फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.
विरार स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात विरारमधील सर्वांत मोठी वाहतूक कोंडी असते. सर्वाधिक कोंडी ही रिक्षाचालकांचीच असल्याने या भागातून एकही खासगी वाहन, चारचाकी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो अन्यथा रेल्वेस्थानकाकडे यायचे असल्यास खासगी वाहने स्थानक परिसराच्या एक किमी आधीच ठेवावी लागतात. रिक्षांची सर्वांत मोठी कोंडी या भागात असते. रिक्षाला वळण यासाठीदेखील येथे जागा उपलब्ध नाही. नागरिकांना चालण्यासाठी जागा राहात नाही. यावर आता पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी एक दिशा मार्ग केला असला तरी फेरीवाला धोरणाचा पत्ता नसल्याने स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा विळखा मोठ्या प्रमाणावर पडला आहे.
विरार स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून स्कायवॉक तयार केले होते; मात्र सद्यःस्थितीत ते वापराविना धूळखात पडले आहेत. त्यावर गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत. आता पश्चिमेकडील स्कायवॉक रेल्वेस्थानकापासून वेगळा केला असला तरी स्थानकाचे काम झाल्यावर तो पुन्हा जोडण्यात येणार आहे. तसेच आता नव्याने पाच आणि सहा रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. जुने तिकीट घरही आता पाडण्यात आले आहे.
रिक्षांचा सुळसुळाट
पूर्वी विरार अर्नाळा मुख्य रस्त्यावरच वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून स्कायवॉक उभारल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला फुलवाले आणि फेरीवाले बसत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. पूर्वी रेल्वेस्थानकात एसटी येत होती; आता मात्र त्या ठिकाणी रिक्षाचा सुळसुळाट झाला आहे. विरारची ग्रामपंचायत काळातील लोकसंख्या १९७२ मध्ये १० हजार होती, तर आता हीच लोकसंख्या सहा लाखांवर पोहोचली आहे.
विरार आणि मजेठीया येथील रस्त्यावरची कोंडी आता कमी झाली आहे. दोन्ही रस्ते एक दिशा मार्गिका तयार करून त्या ठिकाणचे फेरीवाले, रस्त्याच्या मध्येच उभी केलेली वाहने हटविली आहेत. शहरातील अन्य भागातही कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-महेश शेट्ये, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, विरार विभाग
पोलिसांनी एक दिशा मार्ग केला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. आता पालिकेने स्थानकाभोवती पडलेला फेरीवाल्यांचा वेढा तातडीने उठवावा.
-ॲड. सुहास पाटील, नागरिक
वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून स्कायवॉक उभारले, पण त्याने नागरिकांना दिलासा न मिळता रस्त्यावरून चालण्यास अडथळा होऊ लागला आहे. रिक्षाचा गराडा स्थानकाला गिळतो आहे, तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याने नागरिकांना स्थानकात येण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
- कमलाकर गाळवनकर, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.