कचराकुंडी मुक्त मोहिमेला टिटवाळ्यात हरताळ
रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई; पर्यायी व्यवस्था नाही
टिटवाळा, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी शून्य कचरा मोहीम हाती घेतली असली, तरी टिटवाळ्यात मात्र या मोहिमेचा फज्जा उडताना दिसत आहे. रस्त्यावरील कचरा कुंडी हटवून तिथे कचरा टाकण्यास मनाईचे फलक लावले खरे, मात्र पर्यायी घंटागाडीचे नियोजन नसल्याने नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.
महापालिकेने रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई केली आहे. तर, कचरा टाकण्याच्या जागांवर हिरवे पडदे लावले असून सूचनाचे फलक लावले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी हे फलक गायब झाले असून त्याच ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. सकाळी नोकरी व्यवसायनिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांनासाठी महापालिकेच्या घंटागाडीची वेळ ही सोयीची नाही. कचरा टाकण्याचे ठिकाण बंद करत असाल, तर त्याआधी नियमित, वेळेवर येणारी घंटागाडी आणि जवळपास अधिकृत कचरा संकलन केंद्र उपलब्ध करून द्या, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेने स्पष्ट आणि ठोस पर्यायी व्यवस्था जाहीर करावी, नियमित आणि वेळेवर कचरा संकलनाची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. महापालिकेकडून याबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
नियोजनाचा अभाव
महापालिकेने बंदी तर घातली, पण आम्ही घरगुती कचरा कुठे द्यायचा? घंटा गाडी नेमकी कोणत्या वेळेला येते, रोज येते का, याचा काहीही खुलासा नाही. बऱ्याच वेळा घंटागाडी उशिरा येते किंवा येतच नाही. मग नागरिकांना काय करायचे? असा प्रश्न गोदावरी अपार्टमेंट येथील रहिवाशी राणे यांनी उपस्थित केला आहे. तर सध्या तरी या मोहिमेत नियोजनाचा अभाव असून पालिकेने कचरा उचलण्याच्या वेळेचे फलक त्या-त्या ठिकाणी लावून त्याबाबत जनतेत जनजागृती करावी, अशी मागणी जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांनी केली आहे.
शिटी वाजेल आणि गाडी सुटेल
याबाबत टिटवाळा विभागातील पालिकेचे आरोग्य निरीक्षक अक्षय कराळे यांना विचारणा केली असता महापालिका आयुक्तांच्या निर्देशनानुसार शून्य कचरा मोहीम ही प्रभावीपणे राबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर सुका-ओला कचरा वर्गीकरण करण्यासाठी अनेक नागरिक टाळाटाळ करत आहेत. नागरिकांनी ही मोहीम गांभीर्याने घ्यावी. घंटागाडीच्या वेळेची होणारी अडचण दूर करण्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल. तसे फलकही त्या-त्या ठिकाणी लावण्यात येतील. सकाळी सात ते दुपारी १२ यावेळेत व रात्री सहा ते ११ यावेळेत परिसरात कचरा संकलन करण्याची वेळ असेल. कचरा घेण्यासाठी येणारा सफाई कर्मचारी शिटी वाजून सूचित करेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.