माणगाव येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था
धुळीच्या जाड थराखाली नावे अदृश्य; स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी
माणगाव, ता. ३० (वार्ताहर) : माणगाव व तळा तालुक्यातील तब्बल ७७ स्वातंत्र्य सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर अनेकांनी अमानुष कारावास, हालअपेष्टा आणि अन्याय सहन केला. या थोर देशभक्तांच्या बलिदानाची चिरंतन आठवण म्हणून माणगाव येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारात, अत्यंत मध्यवर्ती व दर्शनीय ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य आणि आकर्षक स्मारक उभारण्यात आले होते. मात्र आज हेच स्मारक शासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षेमुळे विदारक अवस्थेत पोहोचले आहे.
स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकारच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे व कारावास भोगलेल्या देशभक्तांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. कालांतराने नवीन तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर हे स्मारक स्थलांतरित करण्यात आले. मात्र त्यानंतर या स्मारकाकडे कोणीही ढुंकून पाहिले नाही. शासनाच्या उदासीनतेमुळे आज हे स्मारक अनाथासारखे पडून असून, त्याची दुरवस्था पाहून स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तीव्र वेदना व संताप निर्माण झाला आहे. स्मारकाच्या आजूबाजूला गवताचे साम्राज्य पसरले असून, स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतो. स्मारकावर कोरलेली स्वातंत्र्य सैनिकांची नावे धुळीच्या जाड थराखाली झाकली गेली आहेत. अनेक ठिकाणी अक्षरे अस्पष्ट झाली असून काही नावे पूर्णपणे अदृश्य होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांनी देशासाठी हसत-हसत बलिदान दिले, तुरुंगवास भोगला आणि अत्याचार सहन केले, त्यांच्या नावांचाच सन्मान आज पुसला जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
..................
नूतनीकराणाची मागणी
दुर्दैवाची बाब म्हणजे स्मारकावर ज्यांची नावे कोरली आहेत, त्यांपैकी बहुतांश स्वातंत्र्य सैनिक आज हयात नाहीत. जिवंत असताना अपेक्षित मान-सन्मान न मिळालेल्या या देशभक्तांच्या स्मृती तरी जपल्या जाव्यात, अशी तीव्र जनभावना आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतो, त्या स्वातंत्र्याच्या शिल्पकारांनाच विसरणे हे राष्ट्र म्हणून आपले अपयश नाही का? असा थेट सवाल आता माणगाव शहरात उपस्थित केला जात आहे. या ऐतिहासिक स्मारकाचे तातडीने नूतनीकरण करून स्वच्छता, संरक्षण व्यवस्था व नियमित देखभाल करण्यात यावी, तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना पुन्हा सन्मानाचे स्थान मिळावे, अशी भावनिक मागणी माणगाव तालुक्यातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.