वंचित उमेदवारापासून ‘वंचितच’
जागा मिळवल्या मात्र उमेदवार नाही; काँग्रेसचे इच्छुक उमेदवार संतप्त
विनोद राऊत, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत काँग्रेस-वंचितमध्ये झालेल्या आघाडीतून ६२ जागा वंचितच्या पदरात पडल्या; मात्र मोठ्या हट्टाने मागून घेतलेल्या दक्षिण मुंबईतील अनेक जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नसल्यामुळे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले नाहीत. त्यामुळे जवळपास १६हून अधिक जागांवर काँग्रेस-वंचितची पाटी कोरी असणार आहे. या जागांवर नेमका कुणाला पाठिंबा द्यायचा, हा यक्ष प्रश्न काँग्रेस नेतृत्वापुढे असणार आहे.
जवळपास २८ वर्षांनंतर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली. काँग्रेसने वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. जागावाटपात सुटलेल्या या ६२ जांगामध्ये कुठलेही बदल होणार नाहीत, असे हमीपत्र वंचितने लिहून घेतले. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यातील अनेक जागांवर वंचितला उमेदवार मिळत नव्हते. मंगळवारी जे कुणी इच्छुक असतील त्यांना आमच्या निवडणूक चिन्हावर लढवायला सांगा, असा निरोप वंचितच्या नेत्यांकडून धाडण्यात आला. सकाळी ११नंतर या जागांवर लढण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तयार करा, असा संदेश काँग्रेस नेतृत्वाला आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पाठवण्याची वेळ आली. एवढ्या कमी वेळेत उमेदवारांची जुळवाजुळव न झाल्यामुळे या जागांवर दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह गायब झाले आहे.
या जागांवर वंचितला उमेदवार मिळत नसल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे सोमवारी वंचितच्या नेत्यांसोबत संपर्क साधून तुमच्याकडे उमेदवार नसतील तर तिथे लढायला काँग्रेसचे उमेदवार तयार असल्याचे कळवण्यात आले. त्यावर वंचितने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
............
पाठिंब्याचा पेच
उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागा बहुतांश दक्षिण मुंबईत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या माहीम, दादर, शिवडी, चेंबूर, परळ, माझगाव, नायगाव, डॉकयार्ड या भागांतील आहेत. यातील अनेक जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढत आहे. त्यांना पाठिंबा देणे शक्य आहे; मात्र काही जागांवर मनसेचे उमेदवार लढत आहेत. मनसेमुळे महाविकास आघाडी फुटली. त्यामुळे या जागांवर मनसेला पाठिंबा कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न काँग्रेस नेतृत्वापुढे पडला आहे.
काँग्रेसलाही सर्वच जांगावर उमेदवार मिळाले नसल्याचे चित्र आहे. दोन ते चार जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. यातील दोन जांगावर अर्ज स्वीकारले गेले नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले. मात्र वंचितसोबत अचानक झालेल्या युतीमुळे तयार उमेदवार कमी झाल्याचे सांगण्यात येते.
वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्याने ६२ पैकी ४६ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले. जवळपास १६ जागांवर उमेदवार न मिळाल्याचे मान्य केले. यातील काही जणांच्या कागदपत्रात त्रुटी होत्या, तर काही उमेदवार योग्य नसल्यामुळे ऐनवेळी रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
........................
काँग्रेसने एक-दोन जागा सोडल्या तर सर्वच जागी उमेदवार दिले आहेत. वंचितने काही ठिकाणी उमेदवार दिले नाहीत, त्याबद्दल मला माहिती नाही.
- वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.