महावितरणचा कारभार ‘रामभरोसे’
वीजग्राहकांची गैरसोय
२० हजारहून अधिक नागरिकांसाठी अवघे १३ कर्मचारी
विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील हजारो वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी येथे अवघे १३ कर्मचारी उपलब्ध आहे. यामुळे वीजग्राहकांना सुविधा पुरवताना तुटपुंज्या कर्मचारीवर्गावर मोठा ताण येत असून, नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुशासन कार्यप्रणाली व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील ओंदे वीज केंद्राअंतर्गत साखरा, विक्रमगड व आलोंडा असे तीन ट्रान्स्फॉर्मर उभारले आहेत. या ट्रान्स्फॉर्मर अंतर्गत शहरासह ग्रामीण भागातही वीजपुरवठा केला जातो. विक्रमगड हा दुर्गम व जंगलपट्ट्याचा भाग असल्याने पावसाळ्यात या सर्व वाहिन्यांमध्ये किंवा ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात येथे अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याचे प्रकारदेखील घडतात. मात्र, हजारो वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी फक्त १३ कर्मचारीच असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो. वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या वसाहतींमुळे महावितरण कार्यालयात तक्रारींना तातडीने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, पण अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुशासन कार्यप्रणाली व कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महावितरणचे उपविभागीय कार्यालय नावापुरतेच
विक्रमगड तालुक्याच्या निर्मितीनंतर येथे महावितरण उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, तेव्हापासून आजतागायत कर्मचारीवर्गाची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील वीजग्राहकांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी केवळ १३ कर्मचाऱ्यांवर आहे. मागील १५ वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महावितरणचे उपविभागीय कार्यालय नावापुरतेच असल्याची प्रतिक्रियादेखील नागरिकांनी दिली.
कर्मचाऱ्यांची गरज
तालुक्याचा विस्तार पाहता विक्रमगड येथे तीन सेक्शन सहाय्यक अभियंता कार्यालय कार्यान्वित होण्याची आवश्यकता आहे. सध्या येथे एकच शाखा असल्याने वीजपुरवठा खंडित होणे, नवीन वीज जोडणी, मीटर बदलणे, डागडुजी व वीज चोरीवर आळा बसवण्यासाठी येथे कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने गरज असल्याचेही सांगण्यात येत आहे. महावितरणने वीजग्राहकांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे, असेही नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विक्रमगड तालुका झाल्यानंतर येथे उपसहाय्यक अभियंताचे कार्यालय उभारण्यात आले, पण आता येथे वीजग्राहकांची वाढती संख्या व त्यांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने तीन नवे सेक्शन सहाय्यक अभियंता कार्यालय व्हावे, अशी आमची मागणी आहे.
- नितीन वाडेकर, जिल्हाप्रमुख, आध्यात्मिक सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.