सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : महापालिका निवडणुकीसाठी आज (ता. १५) नवी मुंबईत सर्वत्र ठिकाणी जल्लोषात मतदान पार पडले. सकाळी मतदान सुरू झाल्यावर काही मतदान केंद्रांवर मशीन आणि कंट्रोल मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्यामुळे मतदानाला उशीर झाला; परंतु प्रशासनाने ही यंत्रे बदलल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा जास्त मतदानाचा टक्का वाढल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत गुरुवारी सकाळी १,१४८ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळी केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती; मात्र हळूहळू गर्दीचे प्रमाण वाढत गेले. मतदान केंद्रांवर तरुणांपेक्षा वयस्कर मतदारांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना आणून सोडण्यासाठी प्रशासनाने वाहनांची सोय केली होती, तर महापालिकेतर्फे निर्माण केलेल्या विविध थीमवरील मतदान केंद्रामध्येही मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान केंद्रांवर प्रशासनातर्फे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा लावल्याचे दिसून आले.
ऐरोली, दिघा, महापे, पावणे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे आणि नेरूळ या भागात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १.३० वाजता नवी मुंबईत ३२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर यंदा महापालिकेने बीएलओंचे बूथ तयार कले होते. त्यांच्याकडून मतदारांना मतचिठ्ठी मिळत असल्याने नाव शोधण्यासाठीचा वेळ लागत नव्हता. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादीत नाव शोधणे सोपे झाले होते.
मतपेट्या बंद पडल्याने गोंधळ
दिघा, रबाळे येथील प्रभाग क्रमांक एक आणि दोन या भागात सकाळी मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ आणि सीवूड्स भागातही काही मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या. अशा ठिकाणी दुसऱ्या मशीन पाठवून प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत केली; परंतु मतदान सुरू होईपर्यंत गर्दी होऊन गोंधळ निर्माण झाला होता.
मतदार याद्यांमध्ये नावे गायब
तुर्भे, महापे आणि पावणे या परिसरातील मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे गायब झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. अशा मतदारांकडे दुसरे पुरावे नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही, तर काही मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागात गेल्याचे समजल्यामुळे त्यांची धावपळ झाली.
मतपेट्यांवर प्रभागनिहाय नावे गायब
पॅनेलनिहाय होत असलेल्या प्रभागाचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार सर्व उमेदवारांनी प्रचारही केला. वर्गीकरण लक्षात यावे, याकरिता प्रशासनाने प्रत्येक गटाला चार रंग देण्यात आले आहेत; परंतु जेव्हा मतदान केंद्रांवर मतदारांना मतपेटीवर अ, ब, क आणि ड असे वर्गवारी केल्याचे नाव नसल्याने मतदान करताना गोंधळ उडाला, असे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र सावंत यांनी सांगितले.
प्रशासनाने ४२ यंत्रे बदलली
१,१४८ मतदान केंद्रांवर प्रशासनाने पाठवलेली ईव्हीएमपैकी ४२ यंत्रे प्रशासनाला बदलावी लागली. ईव्हीएममध्ये एक बॅलेट मशीन येते, तर दुसरे कंट्रोल मशीन असते. काही मतदान केंद्रांवर यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने २० कंट्रोल युनिट आणि ३२ बॅलेट मशीन बदलल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.