वसई-विरारमध्ये शिट्टीचा आवाज घुमला
११५ पैकी ७१ जागांवर विजय; हितेंद्र ठाकूरांनी राखला अभेद्य गड
भाजप ४३, शिंदे शिवसेना एक तर इतर पक्षाचा सुपडा साफ
संदीप पंडित ः सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १६ ः वसई-विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. ‘शिट्टी’चा आवाज पुन्हा एकदा दणदणीत घुमला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी आपला बालेकिल्ला अबाधित राखत स्थानिक राजकारणावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
या निवडणुकीत भाजपनेही जोरदार लढत देत ४३ जागांवर विजय मिळवला. भाजप गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकेरी आकड्यावर होता; मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने दुहेरी आकडा गाठला आहे. असे असले तरी बहुमताच्या आकड्यापासून भाजप दूर राहिला. इतर सर्व पक्षांना मात्र मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. शिवसेना शिंदे गटाला केवळ एक जागा, तर शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भोपळा फुटला नाही, तर अपक्ष आणि इतर उमेदवार पूर्णतः गारद झाले. काँग्रेसने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवल्याने दहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर उभे होते. या सर्व ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत.
निकाल जाहीर होताच वसई-विरारच्या अनेक भागांत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे, फटाके आणि घोषणांनी जल्लोष साजरा केला. ‘शिट्टी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दुसरीकडे, पराभूत पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता आणि निराशेचे वातावरण पाहायला मिळाले.
सत्ता भक्कमपणे कायम राहिली
निवडणुकीत प्रस्थापित नेतृत्व, स्थानिक प्रश्नांवरील पकड, मजबूत संघटन आणि मतदारांशी थेट संवाद हे घटक बहुजन विकास आघाडीच्या विजयामागील मुख्य कारण ठरले. विरोधी पक्षांची विभागणी, एकसंध नेतृत्वाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील नाराजी याचा फटका इतर पक्षांना बसल्याचेही बोलले जात आहे. एकूणच, वसई-विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता भक्कमपणे कायम राहिली आहे. येत्या काळात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि विविध सभापतिपदांवरही बविआचाच दबदबा राहण्याची चिन्हे आहेत. या निकालामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीही वसई-विरार परिसरात बहुजन विकास आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.
-----------------------
बहुजन विकास आघाडीमधून इतर पक्षांमध्ये पक्षांतर केलेले सुषमा दिवेकर, माया चौधरी, महेश पाटील, ज्योती राऊत, सुदेश चौधरी अशा दिग्गजांना पराभवाचा फटका बसला आहे. तर चंद्रकांत बोरुले, प्रदीप पवार, किशोर पाटील हे स्थलांतर केलेले उमेदवार विजयी झाले आहेत.
बहुजन विकास आघाडी - विजयी प्रभाग
प्रभाग क्रमांक :
१, ३, ४, ६-०१, ७, ८, ९, १२, १३, १४,
१९, २०, २१-०३, २४, २५, २६, २७, २८, २९
भाजप - विजयी प्रभाग
प्रभाग क्रमांक :
२, ५, ६-०३, १०, ११, १५, १६, १७, १८,
२१-०१, २२, २३
नजर निकालांवर
एकूण जागा : ११५
बहुजन विकास आघाडी : ७१
भाजप : ४३
शिवसेना (शिंदे गट) : १
शिवसेना (ठाकरे गट) : ०
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ०
अपक्ष/इतर : ०
बहुमतासाठी आवश्यक जागा : ५८
------------------
* शिवसेना (शिंदे गट) - केवळ एका जागेवर समाधान
* शिवसेना (ठाकरे गट) - खाते न उघडता भोपळा
* अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस - एकही जागा नाही
* अपक्ष व इतर पक्ष - पूर्णपणे गारद
* विरोधकांची मतविभागणी आणि संघटनात्मक कमकुवतपणा उघड
* स्थानिक मुद्द्यांवर बविआची पकड कायम
* हितेंद्र ठाकूर यांचे संघटनात्मक नेतृत्व निर्णायक
* विरोधकांना आत्मपरीक्षणाची गरज
* आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी बविआ मजबूत स्थितीत
-------------------------------
ठाकरे गटाला फटका
महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांनी युतीची तयारी केली होती; मात्र शिवसेना ठाकरे गटाने जास्त जागा मागितल्यामुळे ही युती ऐनवेळी तुटली. याचा फटका ठाकरे गटाला बसला आहे. या दोन्ही पक्षांची युती झाली असती तर महाविकास आघाडीच्या एकूणच सदस्य संख्येत वाढ झाली असती.
वर्चस्व दाखवले
वसई-विरार महापालिकेच्या विरार-वसई, नालासोपारा अशा ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असले, तरी निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या उमेदवारांना या पट्ट्यात स्पष्ट नाकारले आहे. तर हायवे वसई गाव व पश्चिम पट्ट्यामध्ये बहुजन विकास आघाडीने आपले चांगलेच वर्चस्व दाखवले आहे. अर्थात बहुजन विकास आघाडीचा एकहाती विजय झाला असला तरी फटका पडलेल्या पट्ट्यामध्ये त्यांना अजून काम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
संघटनात्मक ताकद
बहुजन विकास आघाडीने वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात आपली संघटनात्मक ताकद दाखवत अनेक प्रभागांत चारही सदस्यांचे पॅनेल विजयी केले. प्रभाग क्रमांक १, ३, ४, ६-०१, ७, ८, ९, १२, १३, १४, १९, २०, २१-०३, २४, २५, २६, २७, २८ आणि २९ या प्रभागांमध्ये बविआचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व्यवस्था आणि सातत्यपूर्ण संपर्क याचा फायदा बविआला मिळाल्याचे चित्र आहे. भाजपनेही काही भागांत प्रभाव राखत प्रभाग क्रमांक २, ५, ६-०३, १०, ११, १५, १६, १७, १८, २१-०१, २२ आणि २३ येथे विजय मिळवला; मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजपच्या गोटात निराशा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.