तारापूरला प्रदूषणाचे ग्रहण
औद्योगिक वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
बोईसर, ता.२० (वार्ताहर) : देशातील पहिली अणुऊर्जा संशोधन केंद्र असलेल्या तारापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. पण या वसाहतीतील प्रदूषणाचा विषय अधिक गंभीर झाला असून औद्योगिक विकासाच्या नावाखाली प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे.
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या तारापूर एमआयडीसीमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली. पण या विकासाची किंमत परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या रूपाने मोजावी लागत आहे. सध्या १,६०० हून अधिक कारखाने कार्यरत असलेल्या वसाहतीतून होणाऱ्या वायू, जल, भूमी प्रदूषणामुळे अनेक गावांतील नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रभावी, ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी सातत्याने करत आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली असलेले नियम कागदोपत्री मर्यादित राहिल्याचे वास्तव आहे. कारखान्यांची अनियंत्रित वाढ, रासायनिक सांडपाणी, धुराचे उत्सर्जन, घनकचऱ्याची अयोग्य विल्हेवाट परिसराची अवस्था बिकट बनली आहे. हरितपट्ट्यांची सर्रास विक्री झाल्याने पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हरित लवादाने तब्बल ३६० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, दंडात्मक कारवाईनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
--------------------------------
कठोर निर्बंधाची गरज
- प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असे असतानाही मागील काही वर्षांत राज्याच्या पर्यावरण विभागाने तारापूर एमआयडीसीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे झाले आहे.
- वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होत असून, शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, प्रभावी कारवाई करावी, दोषी कारखान्यांवर कठोर निर्बंध लादावेत, अशी मागणी होत आहे.
---------------------------
धोरणांवर प्रश्नचिन्ह
आरोग्य, पर्यावरण आणि भविष्य सगळेच अंधारात गेले आहे. रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर, सांडपाणी आणि घनकचरा यामुळे तारापूरचा श्वास कोंडला आहे; पण प्रशासन मात्र अजूनही डोळेझाक करत आहे. विकासासाठी नागरिकांचे आरोग्य गहाण ठेवण्यात आले असल्याने राज्याच्या पर्यावरण विभागाच्या धोरणांवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणात तारापूरचे उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
----------------------------
तारापूर एमआयडीसीतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेले आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य दुर्लक्षित केले जात आहेत. कागदावरचे नियम नकोत, तर प्रत्यक्षात कठोर कारवाई हवी; अन्यथा प्रदूषण तारापूरला गिळंकृत करेल.
- केतन राऊत, पर्यावरणप्रेमी
------------------------------
तारापूर एमआयडीसीतील प्रदूषण पर्यावरणाचा नाही, तर मानवी हक्कांचा प्रश्न बनला आहे. प्रशासनाने विकासाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य गहाण ठेवले आहे. जोपर्यंत दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा अन्याय सहन केला जाणार नाही.
- सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.