पाच वर्षांच्या ‘प्रशासक राज’ला पूर्णविराम!
३१ जानेवारीला वसई-विरारला मिळणार नवा महापौर
विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेची पाच वर्षांपासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपणार आहे. राज्यातील महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या ३१ जानेवारीला वसई-विरारला नवा लोकप्रतिनिधी कारभारी मिळणार आहे. यामुळे पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन पुन्हा एकदा ‘जनतेचे सरकार’ स्थापन होणार आहे.
२२ जानेवारीला महापौरपदाच्या आरक्षणाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. वसई-विरारसाठी ‘सर्वसाधारण प्रवर्ग’ असे आरक्षण जाहीर झाले आहे. २७ आणि २८ जानेवारीला इच्छुक उमेदवार महापौर आणि उपमहापौरपदासाठी आपले नामनिर्देशनपत्र (अर्ज) महापालिका सचिवांकडे सादर करू शकतील. ३० आणि ३१ जानेवारीला नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात येईल. याच बैठकीत प्रत्यक्ष मतदान होऊन महापौर आणि उपमहापौर यांची अधिकृत घोषणा केली जाईल.
कोरोना काळ आणि त्यानंतर प्रभागरचनेच्या गोंधळामुळे वसई-विरार महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. परिणामी, गेली पाच वर्षे महापालिकेचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा काळ लोकप्रतिनिधींविना कारभार चालला. आता ३१ जानेवारीला होणाऱ्या या निवडीमुळे शहराला पुन्हा एकदा महापौर मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आहे. बविआ-काँग्रेस आघाडी आणि विरोधातील भाजप यांमधील राजकीय गणिते आता या दोन दिवसांत कशी जुळतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.