दिवस-रात्र काळाकुट्ट धूर
वाड्यात टायर कंपन्यांमुळे प्रदूषण, जनता दरबारात तक्रारी
वाडा, ता. १० (बातमीदार)ः तालुक्यात टायर कंपन्यांचे जाळे पसरवले आहे. बहुतांश कंपन्या शासन नियमांचे उल्लंघन करून सुरू आहेत, तर ५४ टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट जनता दरबारात तक्रारी केल्या आहेत.
वाडा तालुक्यात साधारणपणे ७४ टायर कंपन्या सुरू आहेत. या कंपन्यांमध्ये जुने टायरपासून ऑइल, तारा काढून त्यांची विक्री केली जाते. यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे वाड्यातील डाकिवली, कोनसई येथील नागरिकांनी पालकमंत्र्याच्या जनता दरबारात प्रदूषणासंदर्भात तक्रार केली असून, कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गणेश नाईक यांनी कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण कार्यालयाच्या प्रदूषण अधिकारी सीमा दळवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता वरिष्ठांची परवानगी घेऊनच तुम्हाला माहिती देता येईल, असे सांगून माहिती देण्यास नकार दिला.
-----------------------------------
कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
- जनता दरबारात इतर गावच्या नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारखाने बंद करण्याचे आदेश दिले त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५४ कारखान्यांना बंदची नोटीस पाठवली आहे.
- कारखानदार रात्रीच्या वेळी, तसेच सुट्टीच्या दिवशी कारखाने चालवत असल्याचे दिसून येत आहे. कारखान्यातील सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने मासे, जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. बॉयलरच्या स्फोटांमुळे कामगार मृत्युमुखी पडत आहेत.
-----------------------------
विनापरवानगी उत्पादन
तालुक्यातील उसर, दिनकर पाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोने, कोनसई, डाकिवली गावांच्या हद्दीत टायर कंपन्या बसलेल्या आहेत. या कंपन्यांमध्ये सुरक्षेची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, फॅक्टरी लायसन्स कंपन्यांकडे नाहीत, वनविभागाची परवानगी ही नाही, नगर रचना विभागाकडून बांधकामाची सनद घेतलेली नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत दाखल्यावरच कारखाने उभे आहेत.
-------------------------------
डाकिवली गावातील टायर कंपनी रात्रीपण सुरू असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत आहेत. कंपनीच्या प्रदूषणाविरोधात पालकमंत्र्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यानंतरही कारवाई झाली नाहीतर उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.
- उमेश पाटील, तक्रारदार, डाकिवली
------------------------------
वाडा तालुक्यातील सर्वच टायर कंपन्यांविरोधात वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्याने अपघातांमध्ये निष्पापांचे बळी जात आहे. याप्रकरणी आता हरित लवादाकडे तक्रार करणार आहे.
- कल्पेश पाटील, तक्रारदार, मुसारणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.