नवी मुंबई विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याला गती
उलवे, ता. १८ ( बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत असतानाच, विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमी कालावधीतच मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे विमानतळाच्या विस्ताराची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उड्डाणांची संख्या तसेच प्रवासी क्षमतेत मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विस्ताराचा लाभ मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांना होणार आहे.
दरम्यान, १ फेब्रुवारीपासून नवी मुंबई विमानतळावर २४ तास विमानसेवा सुरू करण्यात आली असली, तरी सध्या वेळापत्रकात मर्यादित बदल करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजल्यानंतर आणि रात्री ९ नंतर प्रत्येकी दोन अतिरिक्त उड्डाणांची भर घालण्यात आली आहे; मात्र येत्या जून महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकूणच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा विमानतळ देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक ठरणार असून, मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक व वाहतूक विकासाला मोठी चालना देणारा ठरेल.
-----
कार्गो सेवा लवकरच सुरू होणार
सध्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता सुमारे दोन कोटी इतकी आहे. या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक रनवे सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात विमानतळावर आणखी एक रनवे उभारण्यात येणार असून, त्यानंतर प्रवासी क्षमता वाढून ती सहा ते ६.५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कामाला २०२६चा पावसाळा संपल्यानंतर सुरुवात होणार असून, २०२९-३०पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळावर टी-१ आणि टी-२ अशी दोन स्वतंत्र टर्मिनल सुरू होतील. याशिवाय, येत्या मे महिन्यापासून पाच मालवाहतूक कंपन्यांकडून कार्गो सेवाही सुरू होणार आहेत. नवी मुंबई विमानतळ कार्गो वाहतुकीसाठी एक प्रभावी आणि पर्यायी केंद्र म्हणून पुढे येणार आहे.