‘तळघर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
ज्येष्ठ कवी अरुण शेवते यांच्या कवितालेखनाचा ५० वर्षांचा टप्पा पूर्ण
मुंबई, ता. १८ : ज्येष्ठ कवी अरुण शेवते यांच्या कविता लेखनाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या निवडक कवितांचा ‘तळघर’ हा विशेष संग्रह प्रकाशित होणार आहे. ग्रंथाली पुस्तक प्रकाशन निर्मित या संग्रहाचे प्रकाशन गुरुवारी (ता. २६) सायंकाळी ५ वाजता वांद्रे (प.) येथील ग्रंथाली प्रतिभांगण, आयडेंटिटी, केन रोड, सरकार हेरिटेजसमोर बँड स्टँड येथे पार पडणार आहे.
प्रसिद्ध समीक्षक रघुधीर शिंदे यांनी या पुस्तकाचे संंपादन केले आहे. या संग्रहात १९७५ ते २०२५ या कालावधीत अरुण शेवते यांनी लिहिलेल्या निवडक कवितांचा समावेश आहे. या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर करणार आहेत. दरम्यान, मराठी कवितेत सामाजिक भान, अंतर्मुखता आणि भाषिक प्रयोगशीलता यांचा संगम साधणाऱ्या शेवते यांच्या काव्यप्रवासाचा हा प्रतिनिधिक आढावा मानला जात आहे.