काँग्रेस प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपची घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून पंतप्रधानांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे पडसाद सायंकाळी मुंबईत उमटले. भाजप कार्यकर्त्यांनी दादर येथील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी २१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
मुंबईत भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २०) टिळक भवनासमोर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले, मात्र या आंदोलनाची आधीच कुमकुण लागल्याने या भागात १०० हून अधिक पोलिस ताफा तैनात करण्यात आला होता. भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने येत असतानाच कामगार मैदानाजवळ पोलिसांनी त्यांना रोखून धरले व ताब्यात घेतले. तरीही काही महिलांनी पोलिसांना चकवा देत टिळक भवन गाठत जोरदार घोषणाबाजी केली. ‘देशाची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही, अशा प्रकारच्या कृतीतून काँग्रेसने आपली मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष व नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना यांनी केली. दरम्यान ‘आम्ही या मोर्चाला चोख उत्तर देऊ शकलो असतो, पण काँग्रेसची ती संस्कृती नाही. तसेच पोलिसांनी जाणीवपूर्वक आंदोलक महिलांना कार्यालयापुढे येऊ दिले,’ असा आरोप टिळक भवन कार्यालयाचे सचिव नामदेव चव्हाण यांनी केला.
दुसऱ्यांदा आंदोलन
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने टिळक भवनासमोर आंदोलन केले होते. आजचे हे दुसरे आंदोलन आहे. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या आंदोलनामुळे या भागातील रहदारी थांबली होती. या आंदोलनामुळे घरी जाण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला, दुसरे म्हणजे कधीतरी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये झडप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे कोणीही आंदोलन करू नये अशी, अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.