भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी करणार काम बंद आंदोलन
पालघर, ता. २२ : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांवर पडत असलेला कामाचा ताण आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी कृती समिती अंतर्गत सोमवार (ता. २३) पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी शासन दरबारी केली होती. मात्र, त्यानंतरही या मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. १४ जानेवारी २०२० रोजी नागपूर खंडपीठाने अभिलेख विभागातील कर्मचारी पवन कुमार केवटे आणि इतर ९८ कर्मचारी यांच्या बाजूने निकाल देत तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय दिला होता. मात्र ही वेतन श्रेणी शासनाने अजूनही लागू केलेली नाही. तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत जून २०२५ मध्ये दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचे मान्य करण्यात आले होते. दीडशे दिवसांचा कालावधी संपून तीन महिने झाले, तरीही अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत.
भूमी अभिलेख विभाग आणि शासन स्तरावरून वेळकाढूनपणा करून कर्मचाऱ्यांचा हक्क डावलला जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दबावतंत्राचा वापर करून काम करून घेतले जात असल्याचे आरोप संघटनेने केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार आहेत.
-------------
या आहेत मागण्या
तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यासह भूकरमापक आणि परिरक्षण भुकरमापक यांची वाढीव पदे मंजूर करावीत, मोजणी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता निश्चित करावा, विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये, खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करावा, ई मोजणी करणारे व्हर्जन सुटसुटीत आणि वापरास सोपे करावे, प्रत्येक कर्मचाऱ्याला मोजणीसाठी पुरेशी साहित्य व यंत्रणा देण्यात यावी, शासकीय सुट्टीच्या वेळी कामकाज करण्याच्या सूचना करू नये, अतिरिक्त काम केल्यास त्याचा मोबदला मिळावा, अशा विविध मागण्या संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत.